‘दिवाळी हा प्रकाशाचा आणि मांगल्याचा उत्सव आपण आनंदाने साजरा करू या ,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई – ‘दिवाळी हा प्रकाशाचा आणि मांगल्याचा उत्सव आपण आनंदाने साजरा करू या आणि सर्वाच्या आयुष्यात सुख-समृद्धी तसेच स्थैर्य येवो, अशी प्रार्थना करू या,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
‘दीपावलीचा सण हा आनंद आणि चैतन्य घेऊन येतो. नव्या कामांची सुरुवात करून आपल्या आयुष्याला तसेच समाजालाही एक चांगले वळण देण्यासाठी हा सण आपल्याला प्रेरित करतो.’ असे या सणाचे वर्णन त्यांनी केले. आज आपले राज्य नव्या आव्हानांना ताकदीने सामोरे जात आहे. अशा स्थितीत आपल्यासमोरील लक्ष्य आहे, ते राज्याला अधिक वैभवशाली बनवण्याचे. राज्याच्या या आजवरच्या सगळय़ा वाटचालीत समाजातील दुर्बल आणि मागासलेल्या घटकांच्या आयुष्यातील अंधारदेखील दूर करून त्यांचे आयुष्य प्रकाशमन करायचे आहे, असा मानस त्यांनी व्यक्त केला.
दिवाळी हा सण सुख आणि आनंद वाटण्याचा आहे. यात जात-धर्म-पंथ अशा भेदभावांना स्थान नाही. बंधुभावाचा आणि सौहार्दाचा संदेश मनाशी बाळगून आपण पुढील वाटचाल केल्यास खऱ्या अर्थाने विकास साधू, अशी मला खात्री वाटते, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे.
राज्याने उद्योगात चांगली आघाडी घेतली आहे भविष्यातही ती टिकून राहील. अनेक रोजगार यातून निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतीला भरभराटीचे दिवस आणण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांमुळे बळीराजाचे भविष्यही उज्ज्वल होणार आहे. प्रकाशाचे प्रतीक असणाऱ्या ऊर्जेच्या उत्पादनात अनेक अडथळे आहेत. हे अडथळे दूर सारून लवकरच आपले राज्य पूर्णपणे प्रकाशमान होण्याकडे आपली वाटचाल करणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. अन्यही अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर अमंगलाचा मुकाबला करावा, असे आवाहन त्यांनी केले. मंगलमय पर्वाची सुरुवात करणारी ही दिवाळी सर्वाना सुख समृद्धीची आणि आनंदाची जावो,’ अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेल्या संदेशात केली आहे.