राज्य सरकारकडून राबवण्यात येणा-या विविध योजनांसाठी ‘आधारकार्ड’ हे महत्त्वाचे ठरणार असून, यापुढे प्रत्येक सेवा केंद्रांवर ‘आधारकार्ड’ मिळेल
मुंबई – राज्य सरकारकडून राबवण्यात येणा-या विविध योजनांसाठी ‘आधारकार्ड’ हे महत्त्वाचे ठरणार असून, यापुढे प्रत्येक सेवा केंद्रांवर ‘आधारकार्ड’ मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. मात्र त्यासाठी काढण्यात येणा-या मुद्रणासाठीची अल्प रक्कम संबंधित केंद्रांवर द्यावी लागेल, असेही ते म्हणाले.
अमरावतीत काही ठिकाणी ‘आधारकार्ड’ कचरा कुंडीत आढळल्याबद्दलचा मुद्दा विधान परिषद सदस्य रमेश शेंडगे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. अमरावती शहर व तालुक्यातील एकूण १९ पोस्ट कार्यालयांत ३,२३६ आधारकार्ड वाटप करणे शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात आली असून, संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील नागरिकांना पूर्वी कोलकाता येथील टपाल कार्यालयातर्फे ‘आधारकार्ड’चे वितरण केले जात होते. मुंबई टपाल कार्यालयाच्या स्पीड सेवेंतर्गत तर सध्या पोस्टातर्फे ‘आधार’चे वितरण केले जात आहे. पण, त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे ‘आधारकार्ड’साठी नोंदणी केल्यानंतर यूआयडी क्रमांक मिळाल्यावर नागरिकांना कोणत्याही सेवा केंद्रातून छापील कार्ड उपलब्ध होईल.
‘आधारकार्ड’साठी आतापर्यंत राज्यातील ५ कोटी ७५ लाख नागरिकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ५ कोटी १५ लाख व्यक्तींना यूआयडी क्रमांक मिळाला आहे. तर ४ कोटी ३४ लाख व्यक्तींना आधारपत्रे पाठवली आहेत. या वर्षाअखेरीस अधिकाधिक लोकांना आधारकार्ड देण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. हे काम अधिक वेगाने होण्यासाठी जादा यंत्रे खरेदी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.