राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मागील ३० वर्षाहून अधिक काळ केवळ एक हजार दोनशे रुपये मानधनावर या महिला परिचर (आया) पूर्णवेळ काम करत आहेत.
मुंबई- राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मागील ३० वर्षाहून अधिक काळ केवळ एक हजार दोनशे रुपये मानधनावर या महिला परिचर (आया) पूर्णवेळ काम करत आहेत. सरकारकडून मात्र या कर्मचा-यांची नोंद अर्धवेळ कर्मचारी अशी करण्यात आलेली असून आतापर्यंत त्यांना तोकडय़ा मानधनावर ठेवले आहे.
सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील सुमारे १० हजार ५००हून अधिक महिला परिचरांना आतापर्यंत अधिकचे मानधन आणि इतर सवलतींपासून वंचित राहावे लागत असून सरकारने आमच्या मानधनात वाढ करावी आणि आम्हाला आता तरी पूर्णवेळ म्हणून नियमित करावे, या मागणीसाठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या माध्यमातून राज्यातील महिला परिचरांनी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या महिला परिचरांना पुणे औद्यागिक न्यायालयाने नियमित कर्मचा-यांच्या अर्धे वेतन देण्याचे आदेश दिले होते, परंतु आतापर्यंत या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. तर सहाव्या वेतन आयोगासमोर साक्ष देताना राज्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी किमान १० हजार रुपयांचे वेतन देण्याची मागणी केली होती, त्यावरही आतापर्यंत विचार झालेला नसल्याचे महासंघाच्या अध्यक्ष मंगला मेश्राम यांनी सांगितले.