राज्यपातळीवरील तब्बल ४७ पक्षांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत.
चेन्नई– राज्यपातळीवरील तब्बल ४७ पक्षांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. २००९च्या लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल १८ पक्षांना राज्यातील राजकीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. तर सहा पक्षांची निवडणुकीतील कामगिरी खराब झाल्यामुळे त्यांचा अधिकृत राजकीय पक्षाच्या गमवावा लागला आहे.
लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट, रंजक माहितीसाठी येथे क्लिक करा.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील आम आदमी पक्ष, तामिळनाडूतील अभिनेता विजयकांत यांचा डीएमडीके, ऑल इंडिया एनआर काँग्रेस आणि पीएमके यांना राज्यातील राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. तर राष्ट्रीय जनता दल या पक्षाला २००९मध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता होती. सध्या मात्र हा पक्ष बिहार आणि झारखंड राज्यातील राज्यपातळीवरील पक्ष झाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विधानसभा निवडणूकीत एखाद्या पक्षाला किमान सहा टक्के मते मिळाल्यास त्याला राज्य पातळीवरील राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. तसेच त्याला स्वतःचे असे निवडणूक चिन्ह देखील मिळते. त्यामुळे त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना एकाच निवडणूक चिन्हावर लढता येते.
तसेच जर एखाद्या पक्षाला देशातील चार राज्यातील राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते.
गेल्या पाच वर्षात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि मिझोराम या इशान्य भारतातील राज्यांमध्ये सर्वाधिक राज्यपातळीवरील पक्ष तयार झाले आहेत. गेल्या काही वर्षामध्ये मुख्य पक्षांतून बाहेरपडून अनेक राजकीय नेत्यांनी नवा पक्ष स्थापन केल्यामुळे राज्यपातळीवरील राजकीय पक्षांची संख्या वाढत चालली आहे.