महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या लेखी परीक्षेची मंगळवारी सुरुवात झाली.
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या लेखी परीक्षेची मंगळवारी सुरुवात झाली.
दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर पेपर देण्यात आला होता. यामुळे पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना उपस्थित राहावे लागले. यासाठी शिक्षण मंडळाकडून यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या.
दहावीच्या परीक्षेला शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतून २१ हजार ९ शाळांमधील एकूण १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. यापैकी मुंबई विभागातून ३ लाख ८२ हजार ४३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मंगळवारी, पहिल्या पेपरची परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळात सुरळीत पार पडली.
पहिल्या दिवशी कॉपी व गैरमार्ग अशी एकूण ४० प्रकरणेच समोर आली. यात सर्वाधिक अशी १३ प्रकरणे ही औरंगाबाद विभागीय मंडळात घडली. तर त्याखालोखाल अमरावती विभागीय मंडळात आठ, नाशिक विभागीय मंडळात सात, नागपूर मंडळात पाच आणि पुणे विभागीय मंडळातून केवळ चारच कॉपी आणि गैरमार्गाची प्रकरणे समोर आली.
तर उर्वरित मुंबई, कोल्हापूर, लातूर आणि कोकण विभागात कॉपीबाबत एकही प्रकरण पहिल्या दिवशी घडले नसल्याची माहिती शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांच्याकडून देण्यात आली.