राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते.
इंदिरा गांधींच्या निधनानंतर ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली, तेव्हा ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते.
आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी, त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असताना, त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर १९८०मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते १९८४ मध्ये पंतप्रधान बनले.