तामिळनाडू सरकारने राजीव गांधी यांच्या मारेक-यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई – तामिळनाडू सरकारने भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सातही दोषींची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी बुधवारी विधानसभेत ही माहिती दिली.
जयललिता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तामिळनाडू सरकारच्या या निर्णयामुळे संथन, मुरुगन, नलिनी, पेरारिवालन, रॉबर्ट पायस यांची सुटका होणार आहे. गेल्या २२ वर्षांपासून हे तुरुंगात बंद आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुरुगन, सांथन आणि पेरारिवालन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना, त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलण्याचा निकाल दिला होता. केंद्र सरकारकडून त्यांच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द केली. त्यानंतर तामिळनाडू सरकारने आज तातडीची बैठक घेऊन या दोषींची सुटका करण्याचा निर्णय घेतला.