मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुधवारच्या बैठकीत झालेल्या ठरावावर शुक्रवारच्या बैठकीत शरद पवार निर्णय घेतील.
मुंबई – अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर शुक्रवापर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होणा-या बैठकीत राजीनामा नाट्यावर पडदा पडेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी ‘अजित पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा’, असा एक ओळीचा ठराव मंजूर केला. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार उपस्थित होते. ‘राजीनामा मी दिला असला तरी अंतिम निर्णय शरद पवारच घेतील’ अशी प्रतिक्रिया त्यांनी बैठकीनंतर व्यक्त केली.
सिंचन प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाने व्यथित होऊन अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्याचे पडसाद दिवसभर राज्यात आणि मुंबईत उमटले. बारामतीमध्ये लोकांनी बंद पाळून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर काही ठिकाणी अजित पवार यांच्या समर्थकांनी आंदोलनही केले. या पार्श्वभूमीवर दुपारी २.०० वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक विधान भवनात झाली. विधान भवनाबाहेर राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ही बैठक पूर्वनियोजित होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनामुळे या बैठकीत राजकीय चर्चा होईल की नाही याबद्दल साशंकता होती. बैठक सुरू होताच कुपेकर यांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या भावना मांडण्याची परवानगी मागितली. मात्र प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आज आपल्यातील एक ज्येष्ठ नेत्यांचे निधन झाले असल्याने कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केले. पक्षाध्यक्ष शरद पवार शुक्रवारी मुंबईत येतील त्यांच्यासोबत बैठक बोलाविण्यात येईल, असे पिचड यांनी सांगितले. त्यावर शरद पवार यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळावी, असे मत आमदारांनी व्यक्त केले.
अजित पवार यांचा निर्णय योग्यच – शरद पवार
सिंचनाच्या प्रश्नावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय योग्य असून त्याचा मला आनंद झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांनी भावनेच्या भरात राजीनामे दिले असून ते आपले राजीनामे परत घेतील, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोलकाता येथे दिली. अजित पवार यांच्या राजीनाम्याचा राज्य सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. केंद्रात आणि राज्यात आम्ही यूपीएसोबत आहोत याचा त्यांनी पुनरुचार केला.
काँग्रेसवर खापर का फोडता?
अजित पवार यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. तो त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. त्याचे खापर काँग्रेसच्या अथवा मुख्यमंत्र्यांच्या माथी का फोडता, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांची जाळपोळ केली हे कृत्य योग्य नाही. त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आवरावे. मुख्यमंत्र्याचा आणि काँग्रेसचा अवमान करणा-या या गोष्टी थांबवा, असे ते म्हणाले. यासंदर्भात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या कानावर आपल्या भावना घातल्याचे ते म्हणाले.
कोण काय म्हणाले?
अजित पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपले कोणतेही मतभेद नाहीत. ‘पवार विरुद्ध पवार’ हे मीडियाने रंगविलेले चित्र आहे. राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतलेला असला तरी त्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाध्यक्ष म्हणून पवारसाहेबांचा आहे. तो मला पूर्णपणे मान्य असेल.मधुकर पिचड , प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. शुक्रवारी पक्षाध्यक्ष शरद पवार हे मुंबईत येत आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आमदारांसोबत ते बैठक घेतील. आमदार आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडतील. शरद पवार देतील तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल.प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदावर कुणाचीही निवड केली जाणार नाही. अजित पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने घेतला आहे. त्यांच्या निर्णयाशी राष्ट्रवादी सहमत आहे.सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
बारामतीच्या जनतेने मला केंद्रात काम करण्यासाठी निवडून दिलेले आहे. राज्याच्या राजकारणात येण्याचा विचार नाही. अजित पवार यांच्या राजीनाम्यामध्ये दबावतंत्राचा कुठलाही भाग नाही. या घडामोडीचा राज्य सरकारवर परिणाम होणार नाही. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आमदारांची चर्चा होईल आणि त्यात या सर्व प्रकरणावर पडदा पडेल.