अर्जुना मध्यम प्रकल्पातून गुरुवारपासून सुरू झालेल्या पाणी विसर्गाचा पहिलाच फटका राजापूर नगर परिषदेला बसला आहे.
राजापूर – अर्जुना मध्यम प्रकल्पातून गुरुवारपासून सुरू झालेल्या पाणी विसर्गाचा पहिलाच फटका राजापूर नगर परिषदेला बसला आहे. अर्जुना नदीपात्रात चिचबांध ते कोंढेतड मार्गावर हंगामी वाहतुकीसाठी बांधलेला पादचारी पूल (साकव) या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. या हंगामी साकवाचे खालील चिरे या पाण्यातून वाहून गेल्याने त्यावरून ये-जा करणे धोक्याचे झाले आहे.
गुरुवारपासून अर्जुना मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गाला प्रारंभ झाला आहे. याबाबत तहसीलदार व लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने तशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्जुना नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा फटका या साकवाला बसला आहे.
अर्जुना नदीपात्रातून पलीकडे कोंढेतड भागात जाणा-या नागरिकांना ये-जा करता यावी, यासाठी नगर परिषदेच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी चि-यांच्या व फळ्यांच्या, सिमेंट आणि मातीच्या सहाय्याने बांधकाम करून हंगामी स्वरूपात साकव बांधण्यात येतो. या वर्षीही नुकताच हा साकव बांधण्यात आला व त्यावरून पादचा-यांची ये-जा सुरू झाली.
गुरुवारी अर्जुनेतील पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने या साकवाखालील दगड, सिमेंट व माती वाहून गेली असून या पूल वजा साकवाला भगदाड पडले आहे. त्यामुळे हा साकव नागरिकांना ये-जा करण्यास धोकादायक झाला आहे. मनसेचे शहराध्यक्ष विवेक ऊर्फ पिंटय़ा गुरव यांनी तत्काळ ही बाब नगर परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असून या साकवाची तत्काळ दुरुस्ती करावी व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे.