राजापूर तालुक्यातील गॅसधारक ग्राहकांसाठी २५ ऑक्टोबरपासून आधारकार्डची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु आधारकार्ड नोंदणी केंद्रातील दिवाळीच्या सुट्टीवर गेलेले कर्मचारी अद्याप न परतल्याने नोंदणीसाठी येणारे गॅसधारक ग्राहक आता निराधार झाले आहेत.
राजापूर – तालुक्यातील गॅसधारक ग्राहकांसाठी २५ ऑक्टोबरपासून आधारकार्डची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु आधारकार्ड नोंदणी केंद्रातील दिवाळीच्या सुट्टीवर गेलेले कर्मचारी अद्याप न परतल्याने नोंदणीसाठी येणारे गॅसधारक ग्राहक आता निराधार झाले आहेत. दिवाळीनिमित्तच्या सुट्टीच्या कालावधीत केंद्र बंद करून गेलेले कर्मचारी अद्याप पुन्हा रुजू न झाल्याने नोंदणीसाठी तालुक्यातून आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.
आधारकार्डच्या नोंदणीप्रक्रियेचे कंत्राट घेणाऱ्या ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या बोटचेपे धोरणाचा फटका तालुक्यातील गॅसधारकांना बसत आहे. दिवाळीनिमित्त २ ते ८ नोव्हेंबपर्यंत हे केंद्र बंद असून, प्रशासनाला याचा मागमूसही नसल्याचे चित्र पुढे आले आहे. गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांनी शासनाकडून मिळणारी सबसीडी थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य असल्याचा फतवा काढला होता. राजापूर तालुक्यात आधारकार्ड नोंदणीचे काम २० टक्केच झालेले आहे.
तालुक्यात सुमारे ९ हजार ६०० इतके गॅसधारक असून त्यांपैकी एक हजार ग्राहकांकडेच आधारकार्ड आहेत. त्यामुळे सरकारने आता प्राधान्याने गॅसधारक ग्राहकांना आधारकार्ड काढता यावे, यासाठी २५ ऑक्टोबरपासून राजापुरातील श्रीराम गॅस एजन्सीलगतच हे आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू केले. २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान अवघ्या २२५ गॅसधारकांची आधारकार्डसाठी नोंदणी या केंद्रात झाली.
२ नोव्हेंबरपासून दिवाळीनिमित्त या आधार नोंदणी केंद्रातील कर्मचारी सुट्टीवर असून ते अद्याप परत आलेले नाहीत. याबाबत राजापूर तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधला असता, ठेकेदाराशी आम्ही संपर्क साधला असून, दोन दिवसात माणसे हजर होऊन आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू होईल, असे उत्तर देण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र संबंधित ठेकेदाराकडून जेवणाची सोय न झाल्याने, या आधारकार्ड नोंदणी केंद्रातील कर्मचा-यांनी राजापुरातून काढता पाय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र जिल्हा प्रशासन आणि ठेकेदाराच्या या बेजबाबदारपणाचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला बसत आहे.