सुरक्षेत त्रुटी राहिल्याने पठाणकोट हल्ला झाल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मान्य केले आहे.
नवी दिल्ली – सुरक्षेत त्रुटी राहिल्याने पठाणकोट हल्ला झाल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मान्य केले आहे. त्यामुळे या हल्ल्याबाबत जबाबदारी निश्चित करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना जबाबदार धरून त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी कॉँग्रेसने बुधवारी केली. रालोआचे पाकिस्तानबाबतचे धोरण लेचेपेचे असल्याने त्यांच्या काळात दहशतवादी हल्ले वाढतात, अशी टीकाही शिंदे यांनी केली.
पठाणकोट हल्ल्याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कॉँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, या हल्ल्यात त्रुटी राहिल्याची जाणीव झाली असल्यास राजीनामा दिलाच पाहिजे. राओला सरकारचे पाकिस्तानबाबतचे धोरण गुळमुळीत असल्याने त्यांच्या काळात दहशतवादी हल्ल्यात वाढ होते. १९९९ ते २००४ या रालोआच्या काळात विमानाचे अपहरण, लाल किल्ल्यावर हल्ला, जम्मू-काश्मीर विधानसभा व संसदेवर हल्ला झाला होता. भाजपा जेव्हा जेव्हा सत्तेवर येतो तेव्हा दहशतवादी कारवाया वाढतात, असा सणसणीत आरोप त्यांनी केला.
पठाणकोट हल्ला झाल्यानंतर त्यावर वेळीच प्रत्युत्तर दिले नाही. या हल्ल्यांमध्ये समन्वय न राहिल्यास त्याला योग्यरितीने तोंड दिले जात नाही. गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर तुम्ही तात्काळ हवाई तळावरील सर्व हालचाली बंद करायला हव्या होतात, असे शिंदे यांनी सांगितले. आपणाला पाकिस्तानशी संबंध सुधारायचे असले तरीही दहशतवादी हल्ले सहन करता कामा नये.
मोदी यांनी पाकिस्तानात काय चर्चा केली? याबाबत देशाला अंधारात ठेवले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे नागरिक, हँडलरच्या सहाय्याने झाल्याचे दिसूनही पाकिस्तानचे पंतप्रधान मोदी यांना फोन करायला पाच दिवस का लावतात? असा सवाल शिंदे यांनी केला. १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाल्यानंतर परराष्ट्रमंत्री दहतवाद्यांना घेऊन कंदाहारला गेले. तेव्हापासून भारत हा देश मजबूत नसल्याचा संदेश जगभरात गेला. दहशतवादी सोडण्यासाठी आपण काहीही करू शकतो, अशी दहशतवाद्यांची धारणा आहे, असे शिंदे म्हणाले.
रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांची जबाबदारी पहिली आहे. तर या संदर्भातील खाती सांभाळणारे गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे जबाबदार आहेत. निष्काळजीपणाची जबाबदारी पंतप्रधानांनी निश्चित करून गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी. गुप्तचर यंत्रणांनी आगाऊ सूचना देऊनही दहशतवादी पठाणकोट हवाई तळात घुसले कसे? असा सवाल त्यांनी केला.
देशाच्या सुरक्षेच्या आघाडीवर हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तानच्या विरोधात रोखठोक भूमिका घेणारे मोदी आता नरम का पडले. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवला, असा थेट आरोप सरकार करायला का घाबरते, असा सवालही त्यांनी केला.