भाजपाच्या हाती सत्ता आल्यानंतर देशाच्या मुख्य प्रश्नांवर जनकल्याणाचा कोणताही कार्यक्रम राबवता न आल्यामुळे या प्रश्नातून लोकांचे लक्ष उडवण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांच्याविरुद्ध राजकीय आकसाने छळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई – भाजपाच्या हाती सत्ता आल्यानंतर देशाच्या मुख्य प्रश्नांवर जनकल्याणाचा कोणताही कार्यक्रम राबवता न आल्यामुळे या प्रश्नातून लोकांचे लक्ष उडवण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांच्याविरुद्ध राजकीय आकसाने छळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय परिस्थितीसंबंधात स्वत: मांडलेल्या ठरावावर अतिशय कडक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक टिळक भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री. नारायण राणे यांनी मांडलेल्या ठरावाला श्री. पृथ्वीराज चव्हाण, श्री. मोहनप्रकाश आदी नेत्यांनी पाठिंबा दिल्यानंतर हा ठराव टाळय़ांच्या गजरात मंजूर झाला.
आजच्या बैठकीत राजकीय ठराव मांडताना श्री. नारायण राणे म्हणाले की, केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजपा सरकारने दिलेले कोणतेही आश्वासन पाळलेले नाही. महागाई कमी झालेली नाही. दामदुप्पटीने वाढली आहे. लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. काळा पैसा भारतात आलेला नाही. सगळी आश्वासने खोटी निघाली. त्यामुळे लोक संतापले आहेत. त्यातून लोकांचे लक्ष उडवण्याकरिता काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याची मोहीम सत्तेवरील नेत्यांनी उघडली असून, थेट सोनिया गांधी यांच्यावरही सुडाच्या कारवाईस सुरुवात झाली आहे.
श्री. अशोक गेहलोत, श्री. दिग्विजय सिंग, श्री. विरभद्र सिंग, श्री. सचिन पायलट, श्री. शंकरसिंग वाघेला आणि महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध केवळ राजकीय आकसापोटी त्यांना कायदेशीर अडचण निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. १९७७ साली श्रीमती इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचाही छळ त्यावेळच्या जनता सरकारने केला होता. परंतु अवघ्या ३० महिन्यांत जनता सरकार कोसळले आणि मतदारांनी पुन्हा इंदिरा गांधींना पंतप्रधानपदी सोपवले. आज सत्तेवर बसलेल्या भाजपावाल्यांना सत्तेची मस्ती आल्यामुळे मुख्य प्रश्न बाजूला टाकून त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे त्याचा राजकीय पद्धतीनेच मुकाबला केला पाहिजे. या ठरावाला पाठिंबा देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सूडबुद्धीने सरकार वागत असल्याची अेनक उदाहरणे दिली.
कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील भीषण दुष्काळाबाबत सरकारने जनतेची केलेली उपेक्षा चारा छावण्या बंद करून पशुधनाची केलेली उपासमार या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव माजी खासदार श्री. रेंगे पाटील यांनी मांडला. आजच्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, भाई जगताप, नसीम खान, माणिकराव ठाकरे आदी नेत्यांसह कार्यकारिणीचे सर्व?सदस्य हजर होते.
येत्या अधिवेशनात काँग्रेस अधिक आक्रमक होणार
नागपूर हिवाळी अधिवेशनात सुरुवातीपासूनच काँग्रेसने कर्जमाफी आणि फडणवीस सरकारच्या घोटाळेबाज नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन सरकारला कोंडीत पकडले होते. त्यावर फडणवीस सरकारने काँग्रेस नेत्यांना सूडबुद्धीने अडचणी आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. तरीही काँग्रेस फडणवीस सरकारच्या प्रत्येक राजकीय खेळीला उत्तर देण्यास सक्षम असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच सरकार विरोधात आक्रमक भूमिका विधिमंडळात घेतली जाईल, असा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला.