केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल केले जाणार असल्याचे संकेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी दिले.
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल केले जाणार असल्याचे संकेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी दिले. ‘‘मंत्रिमंडळात काही जागा रिक्त आहेत.
काही मंत्र्यांकडे विविध खात्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील,’’ असे पंतप्रधानांनी सांगितले.जपान व थायलंडच्या दौ-यानंतर मायदेशी परतताना विशेष विमानात ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.
पी. के. बन्सल यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने हे खाते आता सी. पी. जोशी यांच्याकडे आहे, तर अश्विनी कुमार यांच्या राजीनाम्यानंतर कायदामंत्रीपदाचा कार्यभार कपिल सिब्बल सांभाळत आहे. सध्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री एकापेक्षा अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी फेरबदलाचे संकेत दिले.
‘सोनिया गांधींशी मतभेद नाहीत’
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माझ्यात वाद असल्याचे वृत्त चुकीचे असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे पंतप्रधानांनी सांगितले. सोनिया गांधी आणि मी प्रत्येक विषयावर एकत्रितपणे काम करतो. गरज पडल्यास मी त्यांच्याशी सल्लामसलत करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘खेळ व राजकारणाची गल्लत करु नका
स्पॉटफिक्सिंग प्रकरणाबाबत विचारले असता, ‘खेळ आणि राजकारण ही दोन्ही भिन्न क्षेत्रे आहेत. दोघांनाही एकत्रित आणण्याची गल्लत करू नये,’ असे पंतप्रधानांनी सांगितले. ‘स्पॉटफिक्सिंग प्रकरणाचा तपास सुरू असल्याने या विषयावर वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले,
राजकारणात कोणीही कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो. काही जण एकत्र येतात, तर काही जण सोडून जातात, ही बाब गृहीत धरायला हवी.
संसदेत गोंधळ घालून कामकाजात सातत्याने अडथळे आणणे चुकीचे
आहे. महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी सरकारला मदत करावी.
येत्या काही महिन्यांत महागाई निश्चित कमी होईल. विकासाची धोरणे राबवण्यासाठी रिझव्र्ह बॅँकेला मोकळीक दिली जाईल. देशाचे पतधोरण तयार करण्याचे काम रिझव्र्ह बॅँकेचे असून, त्यांच्या निर्णयांचा मी आदर करतो.