भाजपाचे सरकार केंद्रात आल्यापासून देशातल्या बुवा-बाबांना फारच ‘अच्छे दिन’ आले आहेत. भोळय़ा-भाबडय़ा जनतेसमोर प्रवचन झोडणा-या या बाबांची बौद्धिक आणि सामाजिक विचारधारा देशाला कोणत्या दिशेला घेऊन जाऊ पाहत आहे, हे आता वारंवार दिसून येऊ लागले आहे. म्हणूनच दर महिन्या दोन महिन्याला एखाद्या तरी बाबांमुळे वाद निर्माण होत असतो. गेल्या आठवडय़ात योगगुरू रामदेव बाबा त्यांच्या पंतजली संस्थेतर्फे निर्मिती केलेल्या ‘पुत्र प्राप्ती’ औषधामुळे वादाच्या भोव-यात सापडले तर साक्षीमहाराज यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आल्यापासून देशातील बुवा-बाबांच्या वागण्याच्या एकेक बेताल कहाण्या गाजू लागल्या आहेत. हे खरेच सर्वसंग परित्याग केलेले साधू आहेत की, साधूच्या वेशातील राजकारणी आहेत, असा अनेकदा प्रश्न पडतो. भोळय़ाभाबडय़ा भक्त, भाविक जनतेला भाजपाच्या दावणीला बांधण्यासाठी यांनी साधूचे सोंग घेतले असल्याची शंका ब-याचदा येते. तुकाराममहाराज तर अशा लोकांना कधीही साधू म्हणायला तयार होत नाहीत. केवळ भगवे कपडे घातले म्हणून कुणी साधू होत नाही, कीर्तन किंवा प्रवचन करून साधू होत नाही, अशी साधू असल्याचा आभास निर्माण करून ‘कर्म’ करणा-यांचा तुकाराममहाराज आपल्या कणखर भाषेत समाचार घेताना म्हणतात-
ऐसे कैसे झाले भोंदू
कर्म करोनी म्हणती साधू
राजकारणात एकंदर बोकाळलेल्या बुवा, बाबा आणि साध्वी यांची बेताल वक्तव्ये आणि कृती पाहिली की, तुकाराम महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी अशा ढोंगी लोकांचा घेतलेला समाचार किती योग्य होता, हे पटते. प्रत्येक आठवडय़ात कोणता ना कोणता साधू सध्या वादाच्या भोव-यात सापडतो. गेल्या आठवडय़ात रामदेव बाबा ‘पुत्रवती’ औषधाने वादाच्या भोव-यात सापडले आहेत, तर साक्षी महाराज आणि साध्वी प्राची आपल्या बेताल वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे ‘बेटी बचाव’चा गजर करीत सर्वत्र फिरत असताना रामदेव बाबा मात्र खात्रीने मुलगाच कसा होईल, याची जाहिरात करीत औषधांची विक्री करीत आहेत. याबाबतचा प्रश्न थेट राज्यसभेत विचारला गेला. त्यावर रामदेव बाबांनी पहिल्यांदा ताठर भूमिका घेतली. आपल्या औषधाचे नाव बदलणार नाही, असा निर्धार व्यक्त केला; परंतु प्रसारमाध्यमांच्या रेटय़ापुढे अखेर नमते घेत त्यांनी आता नाव बदलण्याची तयारी दर्शवली आहे. इतके करून ते थांबले नाहीत तर त्यांनी आपल्याला पुढे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम केले जात असल्याचा आरोपही केला. म्हणजे मोदी यांच्यावर झालेल्या टीकेने बाबांचे अंत:करण किती कळवळते, हे दिसून येते. नरेंद्र मोदींवर होणा-या टीकेने आता कासावीस होणारे हेच बाबा काही वर्षापूर्वी रामलीला मैदानावर काँग्रेस सरकारच्या विरोधात उपोषणाला बसले होते. योगाच्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांना जी लोकप्रियता मिळाली आहे, त्याच्यामुळे जे अनेक लोक त्यांचे चाहते बनलेले आहेत त्यांना भडकवून दिल्लीमध्ये आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालण्याचा त्यांचा डाव होता; परंतु दिल्ली पोलिसांनी हा डाव उधळून लावला तेव्हा पुरुषार्थाच्या गप्पा मारणारे रामदेव बाबा सलवार आणि कुर्ता हा स्त्री वेश परिधान करून पळाले होते. यावरून या योग्याच्या मनातील राजकारण्याचे दर्शन घडले होते. पुढे त्यांनी पक्षही काढून पाहिला. मात्र पक्ष चालवणे पहाटे उठून उसासे टाकण्याइतके सोपे नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो कारभार सध्या आवरता घेतलेला दिसतो.
भगव्या कपडय़ातील राजकारणी किती बेफिकीर आणि बेजबाबदार असतात, याची वारंवार साक्ष देण्याचे काम भाजपाचे खासदार साक्षीमहाराज आणि खासदार साध्वी प्राची हे दोघे करीत आहेत. याच दुकलीने काही महिन्यांपूर्वी प्रत्येक हिंदू स्त्रीने चार मुलांना जन्म द्यावा, अशा प्रकारचे विधान करून खळबळ उडवून दिली होती. केवळ चार मुलांना जन्म द्या, एवढे सांगूनच ते थांबले नव्हते, तर प्रत्येक मुलाची विभागणीही त्यांनी करून दिली. एक मुलगा देश सेवेसाठी सैन्यात पाठवा. (अर्थात आहेत ती मुले दर सैन्य भरतीसाठी जातात आणि जादा गर्दी झाल्यामुळे पोलिसांच्या लाठय़ा खाऊन परत येतात, हे साक्ष महाराज यांना माहीत असण्याचे काही कारण नाही.), दुसरा देश कार्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेसाठी द्यावा, तिसरा सामाजिक कार्यासाठी समर्पित करावा आणि चौथा कुळाची वंशवेल वाढत ठेवण्यासाठी घरी ठेवावा, असे सांगितले होते. म्हणजे स्त्रियांचा जन्म कशासाठी असेल तर तो फक्त मुलांना जन्म घालण्यासाठीच आहे, ही संकुचित वृत्ती यातून दिसून येते. विशेष म्हणजे एक स्त्री असूनही भाजपाची दुसरी खासदार साध्वी प्राची यांनीही साक्षीमहाराजांच्या म्हणण्याला पाठिंबा देत हिंदू स्त्रियांनी चार मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिला होता. रामदेव बाबांचे पुत्रवती औषध असेल नाही तर साक्षीमहाराज यांचा चार मुलांना जन्म घालण्याचा सल्ला असेल, या मागे यांच्या लेखी स्त्रियांचे स्थान किती दुय्यम आहे, हेच दिसून येते.
एखादी व्यक्ती किती बेताल आणि बेफिकीर वक्तव्य करू शकते, याचा उत्कृष्ट नमुना गेल्या आठवडय़ात साक्षी महाराजांनी दाखवून दिला. काय तर म्हणे, राहुल गांधी यांनी शुद्ध न होता केदारनाथचे दर्शन घेतले. त्यामुळे भगवान शंकर यांचा कोप झाला. त्यामुळेच नेपाळ आणि भारतात भूकंप झाला. साक्षीमहाराज यांच्या कोणत्याही विधानाला ‘म म’ म्हणणा-या साध्वी साक्षीही यांनीही तसेच विधान केले आहे. साक्षी महाराज असोत किंवा साध्वी प्राची असो, ते आता केवळ साधू किंवा साध्वी नाही तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे ते या देशाच्या संसदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी प्रत्येक वक्तव्य जपून करण्याची गरज आहे. मात्र एखाद्याला अधिकार जरी मिळाला तरी त्याचे महत्त्व कळत नसेल तर काय घडू शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण साक्षीमहाराज आहे.
साक्षीमहाराज बेताल बडबड करीत असले तरी पक्षप्रमुख म्हणून त्यांना योग्य समज देण्याची जबाबदारी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची आहे तर सरकारचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खासदार असलेल्या या साधू साध्वींना समज देण्याची गरज आहे; परंतु इतके बेजबाबदार वक्तव्य करूनही त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. किंबहुना त्यांना साधी समजही दिलेली नाही. यावरून अशा विधानांना पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष या दोघांची मूक संमती आहे काय, अशी शंका घेण्यास बराच वाव आहे. अशी बेजबाबदार वक्तव्ये करून संसदेच्या उच्च परंपरेला धक्का पोहोचवणा-या या खासदारांच्या विरोधात आता विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तरी आपला आवाज बुलंद करावा तरच त्यांच्या वक्तव्यांना लगाम बसू शकेल. सर्व मतभेद विसरून सर्व विरोधी पक्ष याबाबत एकत्र येतील का, हा खरा प्रश्न आहे.