प्रगत लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्षाएवढेच विरोधी पक्षाच्या वर्तनाकडे सगळ्यांचे लक्ष असते. सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षांकडे तेवढीच सतर्कता, अभ्यासूपणा आणि मनाचा उमदेपणाही अपेक्षित असतो. दुर्दैवाने जगातील सगळ्यात मोठी लोकशाही मानल्या जाणा-या आपल्या देशात आज समर्थ विरोधी पक्ष अस्तित्वात नाही. फक्त विरोधासाठी विरोध करणा-या कोत्या मनाच्या नेत्यांनी विरोधी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यामुळे सबंध राजकारण गढूळ झाले आहे. या बेजबाबदार विरोधी पक्षांच्या हल्ल्यातून नव्या उमेदीचे राहुल गांधी जसे सुटत नाहीत, तद्वत ज्ञान, अनुभव आणि चारित्र्यसंपन्न पंतप्रधान डॉ. सिंग यांनाही असभ्य भाषेतील टीकेचा सामना करावा लागतो. हे सर्व कुठे तरी थांबले पाहिजे.
स्वातंत्र्य मिळून सहा दशके उलटल्यानंतर आता भारतीय राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खालावत चाललेला दिसतोय. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्याकडे लोकशाहीच्या रथाची दोन चाके म्हणून पाहिले जाते. या दोन चाकांमध्ये सुसंवाद असेल तरच लोकशाही प्रक्रिया अत्यंत सुलभपणे सुरू राहते, परंतु जर सत्तारूढ आणि विरोधक निवडणुकीचे रणकंदन संपल्यानंतरही एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करत बसले तर विकासाच्या रथाची गती कुंठीत होते, हे आपल्या देशात सुरू असलेल्या घटनाक्रमांवरून दिसते. राजकारणातील लोक केवळ विरोधासाठी कोणत्याही ‘कारणां’चा आधार घेतात, त्यावेळी त्यातील ‘राजकीय’ उद्दिष्टे संपलेली असतात. उरतात फक्त वैयक्तिक हेवे-दावे आणि दर्जाहीन भांडणे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे आज हेच चित्र पाहायला मिळते. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या विरोधात २०१० साली समाजवादी पक्षाचे माजी आमदार किशोर समृते यांनी दाखल केलेल्या अपहरणाच्या दाव्याच्या संदर्भात सीबीआयने जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यावरून तर आमचे राजकारणी परकीय शक्तींच्या हातचे बाहुले बनलेत की काय, अशी शंका येते. समाजवादी पक्षाचे नेते समृते यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात राहुल गांधी यांनी ‘एका महिलेचे अपहरण केले आहे,’ असा आरोप करणारी याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांच्या झंझावाती दौऱ्यांनी उत्तर प्रदेशचे राजकारण गाजायला नुकतीच कुठे सुरुवात झाली होती. विधानसभा निवडणुका समोर येऊन ठेपल्या होत्या. राहुल गांधी यांच्या करिश्म्याने समाजवादी पक्ष मागे पडेल, या संशयपिशाच्चाने समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाला पछाडले होते. त्याच काळात २०१०मध्ये ही याचिका दाखल झाली होती. सीबीआयने या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक निष्कर्ष बाहेर आले आहेत. त्यातील सगळ्यात गंभीर गोष्ट अशी की, राहुल गांधी यांची व्यक्तिगत बदनामी करण्याच्या षड्यंत्रात ‘परदेशी हात’ असल्याचे सिद्ध झाले. जी महिला अस्तित्वात नाही, अशा काल्पनिक महिलेचे नाव घेऊन परदेशातील तीन वेबसाइट्सवर तिचे राहुल गांधी यांनी अपहरण केले, अशा बातम्या झळकल्या. भारतातील प्रसारमाध्यमांनी त्या बातम्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. मात्र मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाचे काम करणा-या समृते यांनी अलाहाबाद येथील न्यायालयात त्या बातम्यांच्या आधारे याचिका दाखल केली होती. सीबीआयने जेव्हा मुळापासून हे सारे प्रकरण तपासले तेव्हा याचिकाकर्त्यांला भरपूर पैसे देऊन न्यायालयात पाठवणारे लोक आणखीन वेगळे आहेत, ही माहिती पुढे आली. विशेष म्हणजे, समृते यांनी स्वत:च या प्रकरणात आपल्याला सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव आणि उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मदत केल्याची कबुली दिली आहे. राहुल गांधी, ज्यांच्या कुटुंबाला भारतीय जनमानसात अत्यंत आदराचे स्थान आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विधायक नेतृत्वाचा आणि विलक्षण कर्तृत्वाचा प्रदीर्घ वारसा असणा-या राहुल गांधी यांची बदनामी करणे, हाच या सगळ्या कारस्थानामागील हेतू होता, हेसुद्धा आता स्पष्ट झाले आहे. थोडक्यात सांगायचे तर प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा ताकदवान आहे म्हणून त्याच्याशी मैदानात न लढता पाठीमागून वार करण्याचाच हा प्रकार आहे. फक्त समाजवादी पक्षच नव्हे तर भाजपसारखा साधनशुचितेच्या गप्पा मारणारा पक्षही अशाच प्रकारचे वर्तन करताना दिसतो, तेव्हा भारतीय राजकारणाची चिंता वाटते, परंतु भारतीय जनतेच्या सुदैवाने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुविद्य आणि समंजस नेतृत्वाच्या हातात भारताचे भविष्य सुरक्षित आहे, ही वस्तुस्थिती मनाला सुखावून जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतलेल्या डॉ. सिंग यांनी आपल्या अर्थज्ञानाच्या बळावर कोट्यवधी भारतीयांच्या जीवनाला, जगण्याला ‘अर्थ’ प्राप्त करून दिला. वास्तविक पाहता, साठी उलटल्यानंतर आयुष्यभर अभ्यासात व्यग्र राहिलेल्या या अर्थतज्ज्ञाने निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य आरामात, कुटुंबासह व्यतित केले असते, तर कुणी काही म्हटले नसते, परंतु डॉ. सिंग यांनी १९९१ पासून भारताच्या अर्थकारणाला गती देण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले. देशाच्या समाजकारणाची परिपूर्ण जाण असल्यामुळे भारताच्या सर्वागीण विकासासाठी जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हेच पर्याय आहेत, हे त्यांनी स्वीकारले. आपण स्वीकारलेली भूमिका त्यांनी अर्थमंत्री म्हणून अवघ्या देशाला समजावून सांगितली होती, परंतु तरीही विरोधासाठी विरोध करणा-या कम्युनिस्ट, संघीय आणि समाजवादी मंडळींनी डॉ. सिंग यांच्यावर असभ्य शब्दांत टीका केली होती. आज सुमारे २१ वर्षानंतर जेव्हा डॉ. सिंग यांनी रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला मुभा देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीही तेच विरोधक तशाच असभ्य पद्धतीने वागताना दिसतात. म्हणजे काँग्रेसमधील युवा नेतृत्वाच्या जोशाचे प्रतीक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या राहुल गांधी यांच्या विरोधात केली जाणारी कारस्थाने आणि प्रकांड पंडित, अनुभवसंपन्न व नि:स्वार्थी पंतप्रधान, जे आज वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहेत, त्यांच्या विरोधातील कारनामे यात कोणताच फरक नसावा, हे विरोधी पक्षांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे निदर्शक आहे. केवळ विरोधी पक्षांकडे मुद्दे नसल्यामुळे हे सगळे घडते आहे, असे नाही तर त्यांची लोकशाहीवर, देशाच्या विकासावर श्रद्धा नसल्यामुळे असे प्रकार घडताना दिसतात. हे सगळे कुठे तरी थांबले पाहिजे. समृद्ध, संपन्न आणि सुखी भारतासाठी सत्ताधारी पक्षाचे नेतृत्वच चांगले असून चालत नाही, तर सकारात्मक दृष्टी असणारे विरोधकही आवश्यक असतात.