भारतावर सध्या गंभीर वैचारिक संकट घोंगावत आहे. कोरभर भाकरीसाठी दिवसरात्र राबणा-या कामगारांवर, गरिबांवर आणि कष्टक-यांवर आपले विचार लादण्याचा उद्योग जोरात सुरू आहे. या भीषण परिस्थितीत ‘लढो पढाई करने को और पढो समाज बनाने को!’.. हा क्रांतिकारी विचार घेऊन देशातील विद्यार्थी व तरुणांनी व्यवस्थेविरोधात रण छेडले आहे.
लाल सलाम!.. निळा सलाम!.. भगवा सलाम!.. हिरवा सलाम!.. ही सृष्टी जितक्या रंगांनी नटली आहे, त्या नाना रंगांचा सलाम!..‘सत्यमेव जयते’!!! सरतेशेवटी विजय हा सत्याचाच होतो. त्यासाठी व्यवस्थेविरोधात दीर्घकाळ लढा आणि संघर्ष चुकलेला नाही. जून २०१५मध्ये चेन्नई आयआयटीत आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल नावाच्या विद्यार्थी संघटनेवर जेव्हा बंदी घातली गेली होती तेव्हापासून देशातील विद्यापीठं आणि संस्था यांच्यातील विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा तीव्रतेने समोर येऊ लागला आहे.
पुण्यातील चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेतील (एफ.टी.आय.आय) विद्यार्थी आंदोलन, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण अथवा दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जनेवि) राजद्रोहाचे प्रकरण. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ‘मनुवादी’ व्यवस्थेने घुसखोरी चालवली आहे. राजकीय दबाव आणि हिटलरशाहीच्या धाकावर देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांची दडपशाही सुरू आहे. विद्यार्थी म्हणून बोलणारा आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलणारा दोघेही देशद्रोही. त्याही उपर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारेही कदाचित देशद्रोह ठरावेत. विचारांना उत्तर बंदुकीच्या गोळीने. लोकशाही विरुद्ध ठोकशाही, असंतोष खदखदत आहे.
‘‘आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य., दर्जाची व संधीची समानता देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमचे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत’’. भारतीय संविधानाच्या या प्रास्ताविकाची तमाम भारतीयांना आठवण करून देण्यामागे ‘लोकशाही’ची पाळेमुळे आणखी घट्ट करणे हा एकमेव स्वार्थ मानावा.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतावर सध्या गंभीर वैचारिक संकट घोंगावत आहे. कोरभर भाकरीसाठी दिवस-रात्र राबणा-या कामगारांवर, गरिबांवर आणि कष्टक-यांवर आपले विचार लादण्याचा उद्योग जोरात सुरू आहे. या भीषण परिस्थितीत ‘लढो पढाई करने को और पढो समाज बनाने को!’. हा क्रांतिकारी विचार घेऊन देशातील विद्यार्थी व तरुणांनी व्यवस्थेविरोधात रण छेडले आहे. जुल्मी ब्रिटिश सत्ता उलथून ६८ वर्षे लोटल्यानंतरही ‘आझादी की लढाई’, संपलेली नाही. आपल्याच देशात स्वातंत्र्यासाठी नारेबाजी सुरू आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या रूपात व्यवस्थेविरोधात निखा-यांची धग वाढली आहे.
‘मी लोकशाहीचा पूजक. भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेवर दृढ विश्वास ठेवणा-यांतील एक. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चंद्रेशखर आझाद, भगत सिंग आणि रोहित वेमुला हे माझे आदर्श. मी बिहारमधील एका सामान्य गरीब कुटुंबातून आलो आहे. माझा लढा हा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक स्वातंत्र्यासाठी आहे. कृपया मला कोणत्याही राजकीय पक्ष वा संघटनेच्या दावणीला बांधू नका! ही स्पष्ट भूमिका राजद्रोहाच्या आरोपाखाली २१ दिवसांहून अधिक काळ तिहार जेलमध्ये काढणा-या ‘जनेवि’तील संशोधक विद्यार्थी कन्हैया कुमारची आहे. त्याने देशविरोधी वक्तव्य केल्याचे सबळ पुरावे नसल्याने नुकतीच त्याची मुक्तता झाली.
झुंडशाही, दडपशाहीचा बळी ठरलेल्या कन्हैया कुमारने तुरुंगातून सुटकेनंतर सरकार आणि इथल्या व्यवस्थेवर हल्लाबोल केला. गरिबांना लखपती बनवण्याचे आमिष दाखवून त्यांच्या भावनांशी खेळणा-या सुटाबुटातील सरकारवर त्याने टीकेचे असूड ओढले. गरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक (मुस्लीम) या देशातील तमाम पीडितांच्या मनाचा ठाव घेताना हा देश नेमका कुणाचा? असा बंडखोर सवाल त्याचा आहे. यात त्याचं नेमकं चुकलं तरी कुठं? तो फुकटची प्रसिद्धी मिळवून गेला. त्याची जीभ कापल्यास चार लाखांचे इनाम देऊ. त्याला गोळय़ा घातल्यास अकरा लाखांचे बक्षीस!. अशी ‘मनू’ची अंडीपिल्ली एकामागोमाग एक बाहेर पडू लागली आहेत.
विद्यार्थ्यांचा नि पर्यायाने ७५ टक्के ‘तरुण भारता’चा आवाज दाबायचा, माणूस संपवायचा इरादा या निमित्ताने उघड झाला आहे. चांगले शिक्षण घेणे, आपल्या देशातील गरीब, आदिवासी, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला व वंचितांच्या अधिकारासाठी लढणे हेच धेय्य, असे जाहीर सांगणा-या कन्हैया कुमारच्या कानी देशद्रोही नाही तर देशप्रेमी असल्याचा आवाज घुमू लागला आहे. शिक्षणाच्या घरात घुसखोरी करणा-या ‘मनू’ला गाडण्यासाठी देशातील विद्यापीठांत क्रांतीची आग धुमसू लागली आहे. इतिहासाच्या पुनरावृत्तीसाठी जागर सुरू झाला आहे.
कम्युनिस्टांच्या चीनमध्ये १९८९ साली विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाने राजकीय व्यवस्थेला हादरा दिला होता. या असंतोषाचा जनक विद्यार्थीच होता. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी मुद्दय़ांवर सरकार उलथवून लावण्यासाठी जगाच्या इतिहासात सलग सात आठवडे हे आंदोलन चालले. या लढय़ाला चिनी नागरिकांनीही पाठिंबा दर्शवल्याने लष्करी राजवट लागू करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. सैनिकांच्या गोळय़ांनी ‘तियामेन स्क्वेअर’ परिसरात शेकडो आंदोलकांचा बळी घेतला होता. या इतिहासाची उजळणी करण्यामागे आपल्या विद्यमान सरकारसाठी धोक्याची घंटा म्हणावी का?
सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराविरोधात बिहारमध्ये १८ मार्च १९७४ ते २५ जून १९७५ साली ‘बिहार छात्र संघ समितीने लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या आंदोलनाने सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याचा इतिहास आहे. २० डिसेंबर १९७३ ते १६ मार्च १९७४ दरम्यान भ्रष्टाचार आणि आर्थिक शोषणाविरोधात गुजरातमध्ये उभा रहिलेल्या ‘नवनिर्माण आंदोलना’ने मुख्यमंत्री चिमणभाई पटेल सरकारला सत्तेतून पायउतार केले होते. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली या लढय़ात गुजरातमधील मध्यमवर्गीयही एकवटल्याने हे आंदोलन इतिहासातील महत्त्वाचे पान ठरले. तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांचा राजीनामाही घ्यावा लागला होता. या आंदोलनात शंभरहून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला तर शेकडोंच्या संख्येने लोक जखमी झाले होते. सुमारे आठ हजारांहून अधिक आंदोलकांना अटकही झाली होती. इतिहास साक्ष देतो आहे!.. आता खरोखर अशा लढय़ाची गरज उरली नाही का? चलो साथी रे, चलो बंधू रे!.. म्हणत ‘लोकशाही’च्या रक्षणासाठी शीतल साठेंसह हजारो-लाखो विद्यार्थ्यांनी इथल्या व्यवस्थेविरोधात एल्गार छेडला आहे.
शिक्षणाच्या दारात, विद्येच्या घरात
पोसली ब्राह्मणशाही..
रोहित गेला, दलित मेला, मरतेय ही लोकशाही
नाही शिकायचं, तुम्ही राबायचं
मनुस्मृतीनं घातली बंदी
वेद ऐकीले तर मंत्र वाचिले तर
शिसं ओतलंय कानामंदी
पिढय़ान्पिढय़ाची मक्तेदारी विद्येची ठोकशाही
रोहित गेला..॥ १॥
आमचा चोखामेळा, गेला पायरीवर
नाही भेटू दिलं विठोबाला
वेदाचा तो अर्थ आम्हासीस ठावा
मारलं कपटानं तुकोबाला
धर्माची नशा, जातीची धुंदी बोकाळली पुंडशाही
रोहित गेला..॥ २॥
करण्या संशोधन गेला विद्यापीठी
बाबासाहेबाचं लेकरू खरं
जातिवाद्यांच्या हो दुखलं पोटामंदी
नाही मनाला वाटलं बरं
हाकलून देऊन अपमान करून दाखवली गुंडशाही
रोहित गेला..॥ ३॥
मंत्री सारे कुलगुरू सारे
सा-यासा-यांनी दाखवली जात
दु:ख काळजामंदी खचला मनामंदी
रोहित वेमुलाचा झाला घात
पदाची गुर्मी नि सत्तेचा माज माजली हो पदशाही
रोहित गेला..॥ ४॥
नाही डरायचं, नाही मरायचं
आता संघर्ष करायचा दादा
आस ठेवूनिया, जिद्द ठेवूनिया आता लढत ऱ्हायाचं दादा
जातीला गाडून मनूला जाळून संपवू ही ठोकशाही
दलित उठला विद्यार्थी भिडला राखण्या ही लोकशाही..