पेणबाजूकडून शहरात येणाऱ्या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे.
नागोठणे- पेणबाजूकडून शहरात येणाऱ्या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्डयात माती आणि डबर टाकण्याचा संबंधित खात्याकडून खटाटोप केला जात आहे. पावसात ही माती बाहेर येऊन खड्डे पुन्हा होत आहेत. त्यामुळे रस्त्याची जाळी झाली आहे.
चार ते पाच कामगार ट्रॅक्टरमधून माती आणून खड्डे भरत आहेत. विशेष म्हणजे सोमवारी येथील शिवाजी चौकातील रस्त्यावरील भरण्यात आलेले खड्डे मंगळवारी पुन्हा तयार झाले. त्यामुळे वरवरच्या मलमपट्टीने हे खड्डे भरण्यामागे काय गुपित आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरून शहरात येण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याच्या अख्यत्यारीतील मुख्य रस्ता आहे. पेण बाजूकडून येणारा हा रस्ता शिवाजी चौक माग्रे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील महामार्गाला पुन्हा जोडला जातो.
रोहे, अलिबाग तसेच मुंबई, ठाणे कडून येणाऱ्या सर्व एसटी बसेस याच मार्गावरून बसस्थानकात येत असतात. या रस्त्यांपैकी पेण फाटा ते शिवाजी चौक या सातशे ते आठशे मीटर लांबीच्या रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. मागील दोन दिवसांपासून पुन्हा या रस्त्याची वरवरची डागडुजी करण्याची काम सुरू आहे.