मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरीकरांनी शनिवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरणाचा आनंद घेतला.
रत्नागिरी- मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरीकरांनी शनिवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरणाचा आनंद घेतला. जिल्ह्यात काही ठिकाणी सकाळपासून पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोळसल्या.
तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते; मात्र येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
आठवडाभर रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेल्या १० दिवसांत जिल्ह्यात सरासरी १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. संध्याकाळी मात्र ढगाळ वातावरण होते. दरम्यान, रत्नागिरीतील मांडवी समुद्रावरील पुलाचे जुने बांधकाम लाटांच्या मा-यामुळे कोसळले.
सिंधुदुर्गात माकडतापाचा बळी
बांदा- सिंधुदुर्गात माकडतापाने पुन्हा उच्छाद मांडला आहे. डेगवे-आंबेखणवाडी येथील सोनू हिरबा देसाई (४०) यांचा माकडतापाने शनिवारी सकाळी मृत्यू झाला. गेले चार-पाच दिवस त्यांना ताप येत होता. त्यानंतर तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
माकडतापाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यांना तातडीने बांबोळी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. माकडतापाची लक्षणे पुन्हा एकदा दिसून आल्याने येथील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
बांद्यात वीज वाहिन्यांवर झाड कोसळले!
बांदा- बांदा-गडगेवाडी येथे शनिवारी सकाळी वीज वाहिन्यांवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. आकेशियाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूकही खोळंबली. बांदा उपसरपंच बाळा आकेरकर यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
बाळा आकेरकर यांच्यासह बाबा गाड, बंडय़ा सावंत, प्रमोद आरोसकर, राजू कदम, सागर राऊळ यांनी श्रमदान करून रस्त्यावरील झाड बाजूला केले.
बांदा वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता आपटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कर्मचा-यांनी अथक प्रयत्न करून सकाळी ११ वाजता वीजपुरवठा पूर्ववत केला.