मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील एकूण १९ हजार ४४७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
रत्नागिरी- मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील एकूण १९ हजार ४४७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील ४ हजार ९२७ नवमतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित ९ ते ३० जून या कालावधीत छायाचित्रात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम राबवण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यात या कार्यक्रमाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे नोंदणी झालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. या कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करणे, यादीतून नाव कमी करणे, दुरुस्ती करणे आदींचा समावेश होता. मतदार यादीत नावनोंदणीसाठी आलेल्या एकूण १९ हजार ४४७ अर्जामध्ये ९ हजार ७४५ पुरुष व ९ हजार ७०२ स्त्रियांचा समावेश होता. यापैकी १८ ते १९ वयोगटातील ४ हजार ९२७ नव मतदार आहेत.
विधानसभा संघनिहाय नोंदणी झालेल्या मतदारांमध्ये १ हजार ९४४ पुरुष तर १ हजार ६८७ स्त्रियांची नोंदणी करण्यात आली आहे. २६४- गुहागर मतदारसंघातून २ हजार ९७८ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये १ हजार ५१९ पुरुष तर १ हजार ४५९ स्त्रियांची नोंदणी करण्यात आली आहे. २६५- चिपळूण मतदारसंघात एकूण ४ हजार ३१४ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये २ हजार १६८ पुरुष तर २ हजार १४६ स्त्रियांची नोंदणी करण्यात आली आहे. २६६- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४ हजार ८०९ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
यामध्ये २ हजार २०५ पुरुष तर २ हजार ६०४ स्त्रियांची नोंदणी करण्यात आली आहे. २६७- राजापूर मतदारसंघात ३ हजार ७१५ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये १ हजार ९०९ पुरुष तर १ हजार ८०६ स्त्री मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मतदार यादीतून नावे कमी करण्यासाठी एकूण १ हजार ५५९ तसेच नाव, पत्ता, वय आदी दुरुस्त्यांसाठी ४ हजार २४९ आणि मतदारसंघातील केंद्रातून अन्य केंद्रात स्थलांतर केलेल्या १६५ मतदारांचे अर्ज दाखल झाले आहेत. ३१ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.