रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा दाह वाढतच आहे. सध्या जिल्ह्यातील ७१ गावांतील १२२ वाडयांत पाणीटंचाई भेडसावत आहे.
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा दाह वाढतच आहे. सध्या जिल्ह्यातील ७१ गावांतील १२२ वाडयांत पाणीटंचाई भेडसावत आहे. या ठिकाणी १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील मंडणगड तालुका टंचाईमुक्त असून रत्नागिरी तालुक्यालाही टंचाईची झळ बसली आहे.
मागील वर्षी जिह्यातील पावसाचे प्रमाण मोठया प्रमाणावर घटले. पाऊस कमी पडल्याने उन्हाळयात पाणीटंचाईचा मोठा धोका निर्माण झाला. संभावीत पाणीटंचाईचा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता.
जिह्यातील १५८ गावांतील २९९ वाडयासाठी टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला होता. मे महिन्याच्या पंधरवडयापर्यंत ७१ गावांतील १२२ वाडयांत टंचाईची भीषण झळ बसू लागली आहे.
एप्रिल आणि मे महिन्यातील उन्हाच्या कडाक्याने पाणीटंचाईची समस्या अधिकाधिक तीव्र होत आहे. उन्हाच्या कडाक्याने पाण्याची पातळी झपाटयाने कमी होऊ लागल्याने अनेक गावे व वाडया टंचाईच्या विळख्यात आल्या आहेत.
मे महिन्याच्या पंधरवडयापर्यंत ज्ह्यिलतील ७१ गावांतील १२२ वाडयांत टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मे महिन्यात वाढलेल्या उन्हाच्या झळांनी टंचाईत अधिकाधिक भर पडत आहे. मान्सूनचे आगमन लांबल्यास टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मंडणगड तालुक्याला अद्याप पाणी टंचाईची झळ बसलेली नाही. दापोली तालुक्यात सात गावे आणि नऊ वाडयांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
खेड तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची आहे. या तालुक्यातील २१ गावे आणि ३५ वाडयांत पाणीटंचाई असून पाच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गुहागर तालुक्यातील ६ गावे आणि १७ वाडयांत पाणीटंचाई आहे. या ठिकाणी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
चिपळुण तालुक्यात ९ गावे आणि १८ वाडयांना पाणीटंचाईची झळ बसली असून; या ठिकाणी दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील १७ गावे आणि २९ वाडयांत पाणीटंचाई सुरू असून या ठिकाणी चार टँकरने पाण पुरवठा सुरू आहे.
रत्नागिरी तालुक्यात दोन गावे आणि दोन वाडयांत पाणीटंचाई सुरू असून या ठिकाणी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. लांजा तालुक्यात पाच गावे आणि सहा वाडयांना एका टँकरने आणि राजापूर तालुक्यात चार गावे आणि सहा वाडयांत एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.