आपण एक साधीसुधी गृहिणी आहोत आणि एवढ्या महिला मेळाव्यामध्ये प्रथमच दादांचे जाहीरपणे नाव घेत आहोत, अशा मिश्कील शैलीत सौ. निलमताई राणे यांनी भाषणाची सुरुवात केली.
चिपळूण– आपण एक साधीसुधी गृहिणी आहोत आणि एवढ्या महिला मेळाव्यामध्ये प्रथमच दादांचे जाहीरपणे नाव घेत आहोत, अशा मिश्कील शैलीत सौ. निलमताई राणे यांनी भाषणाची सुरुवात केली. राणे प्रथम आमदार झाले, तेव्हापासूनच आपण कोकणात येत आहोत. त्या वेळी आपल्याला या महिलांसाठी काय करता येईल का, असे सतत वाटायचे. कुटुंब स्त्रीवरच अबलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम, हा विचार मनात घेऊनच आपण जिजाई संस्थेची स्थापना केली.
ओझरगाव येथे सिंधुदुर्ग भवनाची भव्य वास्तू उभी राहिली. त्यातून महिलांना रोजगार देण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमाला सिंधुदुर्गात यश आले. आता रत्नागिरीतील महिलांसाठी काहीतरी करायचे आहे. त्यांनाही सक्षम करण्यासाठी योगदान देणार असल्याचे आश्वासन सौ. निलमताई राणे यांनी दिले.
रत्नागिरीतील महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या हेतूने चिपळुणातील भोगाळे येथील मैदानात शनिवारी जिल्हा महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसच्या महिला सचिव मेघना शिंदे यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार डॉ. निलेश राणे, महिला कॉँग्रेस प्रदेशच्या अध्यक्षा कमल व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे केवळ निवडणुकीसाठी नाही तर बचतगटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठीचे प्रयत्न आहेत. भविष्यात बचतगटाच्या माध्यमातून या जिल्ह्यात काम करू, तेव्हाच समाधान वाटेल. त्यासाठी सर्वानी साथ द्या. येथे आपण पुन्हा पुन्हा येणारच आहोत. महिलांचे काही प्रश्न असतील, तर थेट आपल्याशी संपर्क साधा. आपण त्यांना न्याय देऊ. या लोकसभा मतदारसंघात खा. डॉ. निलेश राणे यांनी खूप मेहनत घेतली आहे. दोडामार्गापासून चिपळूणपर्यंत असलेल्या मतदारसंघात त्यांनी दांडगा संपर्क ठेवला. सातत्याने प्रवास केला. हे पाहून आपण त्यांना म्हणायचो, याआधीचे प्रभू इतके फिरायचे नाहीत, त्यामुळे डॉ. राणे यांचे कौतुक आहे. येथील जनतेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असेही निलमताई राणे यांनी सांगितले.
कोकण विकासाचा ध्यास राणे कुटुंबाने घेतला आहे. कोकण पर्यटनाचे श्रेय राणे साहेबांनाच जाते. कोणतीही अवघड गोष्ट फक्त राणेसाहेबच सोपी करतात, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे साहेबांना मानणारे महाराष्ट्रात अनेक लोक आहेत. त्यामुळे कोकणी जनतेने त्यांच्याबरोबर राहावे, असे कमल व्यवहारे यांनी सांगितले.
‘महिलांनी फक्त एक पाऊल पुढे टाकावे’
आपल्या खासदारकीला आता पाच वर्षे पूर्ण होत आहेत. २८ वर्षाचा मुलगा आपला आशीर्वाद मागण्यासाठी पाच वर्षापूर्वी आला.. तो आता खासदार झाला आहे. त्यामुळे तोच आशीर्वाद पुन्हा एकदा द्या. भविष्यातील विचार करा आणि जागरूक राहा. महिलांनी एक पाऊल आपल्या मर्जीने पुढे टाकावे आणि मग कसे परिवर्तन घडते ते बघावे, असे भावनिक आवाहन खा. डॉ. निलेश राणे यांनी या वेळी केले.
चिपळुणातील महिला मेळावा केवळ निवडणुकीपुरता नाही. बचतगटांच्या माध्यमातून जे काम सिंधुदुर्गमध्ये सुरू आहे, तसे काम रत्नागिरीत व्हावे, असा आपला आग्रह आहे. आपली आई या जिल्ह्याची माहेरवाशीण आहे. त्यामुळे त्यांनी रत्नागिरीतदेखील महिला सक्षमीकरणाचे काम हाती घेतले आहे. येथील महिलांनी बचतगटांची ताकद एक करा. राणे कुटुंब आपल्या पाठीशी उभे राहील.
सगळ्या अडचणींवर मात करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभ्या महाराष्ट्रात नाही, असे महिला भवन उभे राहिले आहे. कॉँग्रेसच्या माध्यमातून महिला बॅँक सुरू झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षादेखील सोनिया गांधींशिवाय लोकसभेच्या अध्यक्षादेखील महिला आहेत. त्यामुळे महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. महिलांसाठी पूर्वीचा काळ खडतर होता. मात्र, आता दिवस बदलले आहेत. आपल्या आईने घराबाहेर पडून महिलांसाठी कष्ट घेतले. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये बदल झाला आहे, असेही डॉ. राणे या वेळी म्हणाले.