पावसाने व्यत्यय आणलेल्या दुस-या उपांत्य फेरीत पहिल्या डावाच्या आघाडीवर यजमान पंजाबवर विजय मिळवत कर्नाटकने रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
मोहाली- पावसाने व्यत्यय आणलेल्या दुस-या उपांत्य फेरीत पहिल्या डावाच्या आघाडीवर यजमान पंजाबवर विजय मिळवत कर्नाटकने रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गेल्या चार मोसमांत प्रथमच त्यांना ‘फायनल’ गाठता आली. २९ जानेवारीपासून खेळल्या जाणा-या अंतिम फेरीत कर्नाटकला फॉर्मात असलेल्या महाराष्ट्राशी दोन हात करावे लागतील.
उपांत्य फेरीचा पाचवा आणि अंतिम दिवसही (बुधवारी) पावसामुळे वाया गेला. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील १७७ धावांच्या आघाडीच्या जोरावर कर्नाटकने पुढे चाल केली. या लढतीला पावसाचा चांगलाच फटका बसला. पावसामुळे पाचव्याप्रमाणे पहिल्या दिवशीही खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडी निर्णायक ठरली. पंजाबला पहिल्या डावात २७० धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल कर्नाटकने पाच बाद ४४७ धावा करताना पहिल्या डावात आघाडी घेतली.
संक्षिप्त धावफलक : पंजाब – २७० (जीवनजोत ७४, आर. विनय कुमार २७-५) वि. कर्नाटक – पाच बाद ४४७ (नायर नाबाद १५१, वर्मा नाबाद ११४, पांडे ६५). निकाल : पहिल्या डावाच्या आघाडीवर कर्नाटक विजयी.
अंतिम फेरीत विजय झोल नाही
नवी दिल्ली- बंगळूरुत होणा-या ज्युनियर वर्ल्डकपसाठी सराव शिबिराला उपस्थित राहावे लागल्याने महाराष्ट्राचा उदयोन्मुख फलंदाज विजय झोल रणजी करंडकाच्या अंतिम फेरीला मुकणार आहे.
प्रशिक्षक भावे निराश
‘फायनल’मध्ये झोल उपलब्ध नसल्याने महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘दोन दशकांनंतर अंतिम फेरी गाठल्याने आमच्यासाठी यंदाचा रणजी करंडक महत्त्वपूर्ण आहे. मात्र झोलसारखा फॉर्मात असलेला फलंदाज खेळणार नसल्याने निराश झालो. मात्र बीसीसीआयच्या निर्णयापुढे आम्ही काहीच बोलू शकत नाही,’’असे ते म्हणाले.
‘केवळ उपांत्य फेरीपुरता झोल हवा होता’
केवळ उपांत्य फेरीविरुद्धच्या लढतीसाठी झोलला रणजी करंडकात खेळण्याची परवानगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयकडे मागितली होती. त्यामुळे बीसीसीआयने आकसापोटी निर्णय घेतलेला नाही. ज्युनियर संघाच्या सराव शिबिराबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला कल्पना होती,’’ असे बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट ऑपरेशन्स) रत्नाकर शेट्टी यांनी म्हटले.