देशातील सर्व रक्तपेढ्या ऑनलाइन जोडण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे.
नवी दिल्ली- रक्त हा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणीबाणीच्या काळात रक्ताची गरज असताना ते मिळवण्यासाठी शोधाशोध करावी लागते. हा सगळा व्याप लवकरच थांबणार असून देशातील सर्व रक्तपेढ्या ऑनलाइन जोडण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे. त्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला आपल्याला हवे ते रक्त कोणत्या पेढीत उपलब्ध आहे त्याची माहिती मिळणार आहे.
शून्य तासांत बोलताना आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, देशातील सर्व रक्तपेढ्या ऑनलाइन जोडण्यात येणार आहे. यामुळे रक्तपेढय़ांच्या परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल.
एखाद्या गरजू रुग्णाला आपल्याला हवे ते रक्त कोणत्या पेढीत उपलब्ध आहे हे पाहता येईल का? त्यावर नड्डा म्हणाले की, तुमची सूचना चांगली असून त्यावर विचार केला जाईल. सर्वसामान्य माणसाला फायदा होण्यासाठी रक्तपेढ्यांच्या नेटवर्कमध्ये सुधारणा केली जाणार आहे.
शुद्ध व दर्जेदार रक्तपुरवठा करणा-या जगातील ५१ देशांमध्ये भारताचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. ओदिशा, तामीळनाडू आणि उत्तर प्रदेशात गैरव्यवहार करणा-या रक्तपेढय़ांवर कारवाई केली आहे.
सर्वसाधारणपणे रक्तपेढय़ा या राज्य सरकारच्या अखत्यारितील औषध नियंत्रकांकडून नियंत्रित केल्या जातात. रक्तपेढय़ांकडून नियमांची अंमलबजावणी होते की नाही याची सर्व तपासणी नियंत्रकांकडूनच केली जाते.