वाढती लोकसंख्या, आजारांचा प्रसार व अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे रक्ताची मागणी वाढू लागली आहे. परंतु रक्तदानाबाबत असलेली अपुरी माहिती व गैरसमजुतीमुळे रक्तदान करण्यासाठी लोकांचा प्रतिसाद कमी दिसून येतो.
मुंबई- वाढती लोकसंख्या, आजारांचा प्रसार व अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे रक्ताची मागणी वाढू लागली आहे. परंतु रक्तदानाबाबत असलेली अपुरी माहिती व गैरसमजुतीमुळे रक्तदान करण्यासाठी लोकांचा प्रतिसाद कमी दिसून येतो. त्यामुळे मागणीच्या तुलनेत रक्त संक्रमण कमी होत असल्याने रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी २४ लाख रक्त पिशव्यांची गरज असताना रक्ताच्या १७ ते १८ लाख पिशव्या जमा होतात. वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी १३ लाख असूनही यातील अर्ध्या लोकांनी तरी रक्तदान करावे, असे आवाहन ‘जागतिक रक्तदान दिना’चे औचित्य साधून रक्तदान चळवळीचे कार्य करणा-या कार्यकर्त्यांनी केले आहे.
‘राज्य राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदे’च्या अहवालानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात २००१ मध्ये ७,३९५ रक्तदान शिबिरातून ७.०१ युनिट रक्त संकलन करण्यात आले होते. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन २०१४ मध्ये २४,६४७ रक्तदान शिबिरातून केवळ १५ लाख ६३ हजार युनिट रक्ताची साठवण करण्यात आली होती. तर २०१५ मध्ये १५ लाखांहून अधिक रक्ताच्या बाटल्या जमा केल्या होत्या. रक्तदात्यांची ही संख्या जरी वाढताना दिसत असली तरी अद्याप रक्तदानासंदर्भात लोकांमध्ये आवश्यक तेवढी जागरूकता निर्माण झालेली नाही.
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी लोक रक्तदान करताना दिसतात. त्यामुळे, रक्तदानाची टक्केवारी घसरलेली दिसून येते. दरवर्षी २४ लाख रक्त पिशव्यांची गरज भासते मागील वर्षी रक्तदान शिबिरातून १७ ते १८ लाख रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या होत्या. ही संख्या खूपच कमी आहे. मध्य-महाराष्ट्रात तर रक्ताचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. याशिवाय, शस्त्रक्रिया, बाळंतपणातील अतिरक्तस्त्राव, रक्ताचा कर्करोग व अपघातात रक्तस्त्राव झाल्यास रुग्णाला तातडीने रक्त चढवावे लागते. हिमोफिलिया व थॅलेसेमिया रुग्णांना तर वेळोवेळी रक्ताची गरज भासते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने मृत्यूचा आकडाही वाढत आहे. यामुळे, नागरिकांना स्वत: पुढाकार घेऊन रक्तदान केले पाहिजे, असे ‘लाईफ लाईन ब्लड बँके’चे संचालक डॉ. हरीष वरभे यांनी दै. प्रहारशी बोलताना सांगितले. रक्तदान करणे हे आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी रक्तदान केले, तरी महाराष्ट्रात रक्ताअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, अशी अपेक्षाही डॉ. वरभे यांनी व्यक्त केली.
रक्तदान कोण करू शकतो
१८ ते ६० वर्ष वयोगटातील लोकांना रक्तदान करता येऊ शकते. यासाठी रक्तदात्याचे वजन किमान ४५ किलो असणे आवश्यक आहे. निरोगी व्यक्तीच्या शरीरात ४.५ ते ५ लिटर रक्त असते. रक्तदान करताना त्यातील फक्त ३५० किंवा ४५० मि. ली. रक्त काढले जाते. सरकारतर्फे रक्तदानासंदर्भात विविध स्तरावर जनजागृती निर्माण करण्यात येत असूनही रक्तदान करण्यास कोणी पुढे येत नाही. रक्तदान केल्यानंतर तीच व्यक्ती तीन महिन्यांनंतर पुन्हा रक्तदान करू शकते. मधुमेह, कावीळ, एचआयव्ही असलेल्यांनी रक्तदान करणे टाळावे. रक्तदान करणा-या व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा जास्त असावे.
राज्यात सध्या २६९ रक्तपेढय़ा असून यातील सरकारच्या ७३ रक्तपेढय़ा आहेत. रेडक्रॉस, धर्मादाय तसेच खासगी रक्तपेढय़ा मोठय़ा प्रमाणात असून मुंबईत ५६ रक्तपेढय़ा आहेत. मुंबईतील सर्व रुग्णालयांत मिळून वर्षभरासाठी अडीच लाख रक्ताच्या पिशव्या एवढी गरज आहे. तर महाराष्ट्राची गरज अंदाजित २४ लाख रक्ताच्या पिशव्यांची आहे. दरम्यान महाराष्ट्रात दरवर्षी १७-१८ लाख रक्ताच्या पिशव्या जमा होतात; परंतु जे लोक रक्तदानासाठी पुढे येत नाहीत, अशा लोकांसाठी विविध स्तरावर जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती जागतिक रक्तदान दिनानिमित्त आरोग्य सेवा विभागाच्या अधिका-याने दिली.