सध्याची शैक्षणिक परिस्थिती पाहता, कॉलेजात सादर करावा लागणारा प्रकल्प त्याचं ‘गुणात्मक’ उद्दिष्ट ओलांडून जेव्हा एक सामाजिक उपक्रमाचं रूप घेतो, ते ख-या अर्थाने शिक्षणाचं यश म्हणावं. याचं आदर्श उदाहरण बनलीय, वुई स्कूलच्या मॅनेजमेंट विद्यार्थ्यांची ‘निर्वाणा’ टीम. या टीमने ‘ब्लड कनेक्ट’ या संकल्पनेतून सादर केलेल्या प्रकल्पाने त्यांच्या संस्थेच्याच कॅम्पसमध्ये ‘रक्तदाना’चा यशस्वी उपक्रम राबवला आणि यंदाच्या ‘मुनिजन’ पुरस्काराचे ते मानकरीही ठरले. व्यवस्थापनाच्या या विद्यार्थ्यांच्या यशाची ही गोष्ट..
सध्या शिक्षणाला ‘ज्ञानात्मक’ नव्हे ‘गुणात्मक’ दर्जा प्राप्त झाल्याने कॉलेजमधील प्रकल्प हे प्रत्यक्षात राबवण्याच्या संकल्पनेला विद्यार्थी कागदासारखीच गुंडाळी करून खिशात ठेवताना दिसतात. फक्त गुण मिळवायचे या एकाच उद्देशाने प्रकल्प (प्रोजेक्ट) सबमिट करण्याच्या प्रयत्नात शक्य तेवढी माहिती ‘कॉपी-पेस्ट’ करून तो ‘डेडलाइन’लासादर केला जातो.
पण या कॉलेज प्रोजेक्ट्समधून तुमच्या गुणांमध्ये भर पडत असली तरी मुळात हे प्रोजेक्ट तुमच्या प्रत्यक्ष ज्ञानाची परीक्षा घेणारे असतात. त्याला जर तुम्ही स्वत:चं ज्ञान, कल्पकता आणि मेहनत यांची जोड दिलीत तर मात्र तो केवळ ‘प्रोजेक्ट’ न राहता एक ‘उपक्रम’ होतो. याचं आदर्शवत उदाहरण बनलीय, वेलिंगकर एज्युकेशन- वुई स्कूलच्या मॅनेजमेंट विद्यार्थ्यांची ‘निर्वाणा’ टीम!
‘ब्लड कनेक्ट’ या संकल्पनेतून या टीमने ‘ब्लड डोनेशन ड्राइव्ह’ अर्थात रक्तदानाचा उपक्रमच हाती घेतला आहे. मात्र ‘चॅरिटी बिगिन्स अॅट होम’ म्हणजेच ‘दान हे आधी स्वत:च्या घरापासून सुरू व्हावे’, या उक्तीनुसार व्यवस्थापनाच्या या विद्यार्थ्यांनी प्रथम हा उपक्रम आपल्याच वुई स्कूल कॅम्पसमध्ये यशस्वीरीत्या राबवला आणि आता ते या उपक्रमाची मशाल मुंबईतल्या जास्तीत जास्त कॉलेज कॅम्पसमध्ये पेटवण्याचं लक्ष्य ठेवून आहेत.
वेलिंगकरच्या एमएमएसच्या २०१२-१४ बॅचमधील सुश्रुत निकाळजे, तुषार चोगले, गजेंद्र उगिले आणि सुशांत सुतार या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपली ‘निर्वाणा’ टीम तयार केली. त्यांच्यात ऊर्मी होती, एक सामाजिक उपक्रम राबवण्याची. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे, हे जाणून त्यांनी रक्तदान उपक्रम राबवण्याचे ठरवले. खरं तर या विचाराला प्रेरणा मिळाली ती, गांधी जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या ‘मुनिजन’ या पुरस्कारातून. दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त ही स्पर्धा घेतली जाते.
प्रत्येक कॉलेज, संस्थांमधून विद्यार्थ्यांना आपल्या एका सामाजिक प्रकल्पाची संकल्पना मांडायची असते. जो प्रकल्प सर्वात जास्त समाजाभिमुख असेल त्याची निवड केली जाते. त्यानंतर प्रश्नोत्तर सत्रातून केवळ कागदोपत्रीच नव्हे तर प्रत्यक्षातही तो राबवणं विद्यार्थ्यांना शक्य होईल का, याची पडताळणी केली जाते. या स्पर्धेत निर्वाणा टीमने आपली ‘ब्लड कनेक्ट’ संकल्पना मांडली आणि अनेक राउंड पार करत यंदाच्या ‘मुनिजन’ पुरस्काराचे ते मानकरी ठरले.
आता हा प्रकल्प फक्त प्रकल्पच ठेवायचा नाही, या जिद्दीने या टीमने तो प्रत्यक्ष राबवण्यासाठी सुरुवात केली ती आपल्या कॉलेज कॅम्पसमधूनच. त्यासाठी या टीमने आपल्याच संस्थेतील एनएसएस युनिटची मदत घेऊन स्थानिक ब्लड बँक्स आणि हॉस्पिटल्स यांच्याशी संपर्क साधला. उपक्रमासाठी लागणारे बेड्स, इतर साहित्य, डॉक्टरांची टीम, रक्तदानानंतरच्या रिफ्रेशमेंट्स आदींची व्यवस्था जुळवून आणली. कॉलेजमधील जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी ते अगदी सुरक्षा कर्मचा-यांपर्यंत सा-यांनाच या ड्राइव्हमध्ये सहभागी करून घेण्यासाठी कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी पोस्टर्स तयार करून लावले.
तरुणाईसाठी जलद संपर्काची माध्यमं ठरतील असे इमेल्स, एसएमएस पाठवले. त्याव्यतिरिक्त प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण करून त्यांना उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं. रक्तदान केलेल्या विद्यार्थ्यांना लाल रंगाचे हँडबॅँड तसंच बॅच देऊन त्याद्वारे इतरांपर्यंतही हा संदेश पोहोचवण्याची युक्ती या टीमने केली.
आपल्या संस्थेतून घेत असलेले मॅनेजमेंटचे धडे त्यांनी प्रत्यक्षात उतरवले, असंच इथे म्हणावं लागेल. त्यांच्या या मेहनतपूर्ण प्रयत्नातून जवळजवळ १६५ ब्लड बॅग्ज त्यांनी उभ्या केल्या. हा उपक्रम ख-या अर्थाने समाजाभिमुख व्हायचा असेल तर हे रक्त गरजूंपर्यंतच पोहोचलं पाहिजे, ही भूमिका घेऊन त्यांनी या ब्लड बॅग्ज कोणत्याही खासगी रक्तपेढयांना न देता नायर हॉस्पिटल आणि सर जे. जे. महानगर रक्तपेढी यांना देऊन एक मदतीचा हात पुढे केला आहे. टीमच्या या एकूण व्यवस्थापनात त्यांना वुई स्कूलच्याच पीजीडीएम (हेल्थकेअर मॅनेजमेंट)ची?विद्यार्थिनी ऋतिका डोहे तसंच प्रा. जलपा ठक्कर आणि सामाजिक उद्योजकता विभागाचाही सहभाग लाभला.
कॅम्पसमध्ये दिवसभर राबवल्या गेलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अक्षरश: रांगा लावून नोंदणी करून रक्तदान केले. जे विद्यार्थी रक्तदानासाठी पात्र ठरत नव्हते, त्यांनी व्यवस्थापनात मदत करून आपला सहभाग दर्शवला. रक्तदान केल्यानंतर प्रत्येकांना आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी तिथे एक बोर्ड ठेवण्यात आला होता. हे योगदान छोटं असलं तरी त्यातून मिळालेलं मानसिक समाधान फार मोठं असल्याच्याच प्रतिक्रिया या बोर्डवर उमटलेल्या दिसल्या.
ही टीम सांगते, ‘मुंबईतील रक्ताची गरज याविषयीच्या एका अभ्यासात आम्ही वाचलं की, दर दिवसाला मुंबईत साधारण ६२५ युनिट्स रक्ताची गरज निर्माण होत असते. म्हणजे दरमहा २० हजार युनिट्स एवढी. एका युनिटमधून साधारण तीन रुग्णांचा जीव वाचवता येतो. याचं संपूर्ण भारतातलं प्रमाण पाहिलं तर सध्याच्या स्थितीत आपल्याकडे साधारणपणे वर्षाला ६० लाख युनिट्स रक्ताची कमतरता भासते.
ही आकडेवारी जेव्हा आम्हाला कळली, तेव्हा तो एक धोक्याचा इशाराच वाटला. त्यासाठी आजची तरुण पिढी म्हणून आपणही समाजाचे देणे लागतो, या विचाराने आम्ही आमच्या पुरस्कारप्राप्त प्रकल्पाचं ख-या अर्थाने चीज करण्याचं ठरवलं. आता हा रक्तदानाचा उपक्रम इथवरच न ठेवता प्रत्येक कॉलेजमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’
आजच्या तरुण पिढीला योग्य प्लॅटफॉर्म दिला गेला, त्यांच्यातील ऊर्जेचं योग्य पद्धतीने चांगल्या कामासाठी रूपांतर केलं गेलं तर एक यशस्वी सामाजिक उपक्रम उभा राहू शकतो, हे निर्वाणा टीमने दाखवून दिलं. हेच या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पातून उभ्या राहिलेल्या सामाजिक उपक्रमाचं यश! या उपक्रमाचा तुम्हीही एक भाग बना आणि जेव्हा ही निर्वाणा टीम तुमच्या कॅम्पसमध्ये येईल तेव्हा रक्तदान नक्की करा आणि दाखवून द्या तरुणाईची ताकद!