‘हिमोव्हिजिलन्स’ उपक्रमांतर्गत रक्तदात्यांना वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या मोबाइलवर शुभेच्छापर संदेश पाठवण्यात येणार आहे.
मुंबई- तरुणपिढीने दरवर्षी रक्तदान करावे, यासाठी या तरुणांना त्यांच्या वाढदिवसादिवशी शुभेच्छापर संदेश पाठवण्यात येणार आहेत. यासाठी राज्यात पहिल्यांदाच ‘हिमोव्हिजिलन्स’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प महाराष्ट्रात प्रथमच राबवण्यात येणार असून, प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम भायखळय़ातील सर जे. जे. महानगर रक्तपेढीत सुरू केला जाणार आहे. या उपक्रमाकरता निविदाही काढण्यात आल्या असल्याची माहिती सहायक संचालक डॉ. संजय जाधव यांनी दिली.
प्रहार कौल-
[poll id=”666″]
‘हिमोव्हिजिलन्स’ उपक्रमाचा भाग म्हणून रक्तदात्यांना वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या मोबाइलवर शुभेच्छापर संदेश पाठवण्यात येणार आहे. तरुणपिढी मोठय़ा प्रमाणात रक्तदान करते. त्यांचे आभार मानत त्यांनी पुन्हा रक्तदान करावे, या उद्देशाने त्यांना शुभेच्छापर संदेश पाठवला जाईल. यामुळे रक्तदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
दरम्यान, २०१३ मध्ये राज्यात १४ लाख ७५ हजार ९३५ रक्त बाटल्या जमा करण्यात आल्या आहेत. २०१२ मध्ये १४ लाख ४१ हजार १११ रक्त बाटल्या जमा करण्यात आल्या होत्या. शहरापासून खेडय़ापर्यंत राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तदानाची मोहीम अधिक सक्रिय केली आहे.
२०१३चा विचार केला असता, राज्यात तब्बल २१ हजार १४२ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यातून १४ लाख ७५ हजार ९३५ रक्त बाटल्या जमा करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ९४.२५ टक्के रक्त हे स्वैच्छिक रक्तदान आहे.
काय आहे हिमोव्हिजिलन्स उपक्रम?
रक्तपेढय़ांत जमा होणा-या रक्ताचा हिशेब ठेवण्यासाठी तसेच जमा झालेल्या रक्ताची योग्य तपासणी करण्याकरता राज्यभरातील सर्व रक्तपेढय़ांत ‘हिमोव्हिजिलन्स’ ही अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यानुसार रक्तपेढय़ांत किती रक्तपिशव्या जमा झाल्या, रक्त पिशव्यांची तपासणी झाली का इत्यादी माहिती मिळणे शक्य होणार आहे. झालेल्या चुका वारंवार होऊ नयेत, म्हणून कर्मचा-यांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दिवाळीअखेर दहा नवीन मेट्रो रक्तपेढ्या
राज्यातील ग्रामीण जनतेला तात्काळ दर्जेदार रक्त व रक्तघटक उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून १० नवीन मेट्रो रक्तपेढय़ा उभारण्यात येणार आहेत. या मेट्रो रक्तपेढय़ांचे काम अंतिम टप्प्यात असून, दिवाळीपासून या रक्तपेढय़ा कार्यान्वित होतील. नाशिक, नगर, जळगाव, ठाणे, पुणे, सातारा, परभणी, अमरावती, चंद्रपूर , नागपूर येथे या मेट्रो रक्तपेढय़ा आहेत.
‘जीवन अमृत सेवे’ला उत्तम प्रतिसाद
आरोग्य विभागाने फेब्रुवारी महिन्यात ‘जीवन अमृत सेवा’ हा उपक्रम सुरू केला आहे. एका फोनवर नातेवाईकांना रक्त उपलब्ध करून दिले जाते. आतापर्यंत ४,४०८ जणांना या उपक्रमात रक्त देण्यात आले आहे. तर ६,६७३ जणांनी रक्ताबाबत विचारणा किंवा विनंती केली होती.