प्रवासी आणि मालवाहतूक भाड्यात वाढ करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला आहे. मात्र उपनगरी भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही.
नवी दिल्ली- प्रवासी आणि मालवाहतूक भाड्यात सुमारे दोन टक्के वाढ करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या अंतर्गत खर्चात वाढ झाल्यामुळे पडलेला आर्थिक भार सुसह्य करण्यासाठी ही भाडेवाढ केली जाणार आहे.
मात्र, उपनगरी आणि बिगर उपनगरी भाडय़ात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. २०११-१२च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या फ्युएल अॅडजस्टमेंट कॉम्पोनंट या प्रणालीअंतर्गत ही भाडेवाढ केली जाणार आहे. डिझेलच्या दरात झालेली ७.३ टक्के व विजेच्या दरात झालेली १५ टक्के वाढ यामुळे वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वातानुकूलित व स्लीपर श्रेणीच्या भाडय़ात २ टक्के, तर मालवाहतुकीच्या दरात १.७ टक्के वाढ होणार आहे.