२०१४ लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये दणदणीत विजय मिळवणा-या भाजपाचा अवघ्या दीडवर्षातच बिहारमध्ये धुव्वा उडाला आहे. बिहारी जनतेने भाजपाला नाकारल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. बिहारमधल्या भाजपाच्या पराभवासाठी ही कारणे असू शकते.
१) बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी जातीनिहाय आरक्षणाचा फेरविचार करावा असे मत व्यक्त केले होते. बिहारमध्ये जातीचा फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे. सरसंघचालकांच्या या विधानामुळे धर्मनिरपेक्ष आघाडीला आयताच मुद्दा मिळाला. लालूप्रसाद यादव यांनी या वक्तव्याला सवर्ण विरुध्द मागास असा रंग दिला. भाजपाने जाहीर सभांमधून जातीनिहाय आरक्षणाला अजिबात धक्का लावणार नाही असे आश्वासन दिले. बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ओबीसी समाजाचा असेल असेही सांगितले. पण त्याचा काही फायदा झाला नाही.
२) मुस्लिम मतदार आणि भाजप यांच्यामध्ये नेहमीच विश्वासाचा अभाव राहिला आहे. बिहारमध्ये १५ टक्के मुस्लिम मतदार आहेत. मुस्लिम मतांची ही संख्या आपल्या बाजूला वळवणे हे भाजपासाठी नेहमीच आव्हान राहिले आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांची झालेली विभागणी भाजपाच्या पथ्यावर पडली होती. यावेळी नितीश, लालू आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे एकगठ्ठा मुस्लिम मते धर्मनिरपेक्ष महाआघाडीला मिळाली. गोमांस बंदी, दादरी हत्याकांड या घटनांमुळेही मतदारांनी धर्मनिरपेक्ष महाआघाडीचा पर्याय निवडला.
३) अकबरउद्दीन ओवेसी यांचा बिहारमधील प्रवेश भाजपाला फायद्याचा ठरेल असे सुरुवातीला वाटत होते. पण प्रत्येत टप्प्यावर निवडणुकीत जशी प्रगती होत गेली तसतशी धर्मनिरपेक्ष महाआघाडी ओवेसी मतविभाजन करुन भाजपाला फायदा पोहोचवणार हे मतदारराजाला पटवून देण्यात यशस्वी ठरली. त्यामुळे एमआयएमचा प्रभाव अजिबात दिसून आला नाही.
४) बिहारमध्ये काँग्रेस शर्यतीत कुठेच नव्हती. काँग्रेसच्या पराभवामुळे भाजपाला फायदा अशी स्थिती इथे नव्हती. काँग्रेस स्पर्धेत दिसत नसली तरी, काँग्रेसने जदयू आणि राजदला एकत्र ठेवण्याची महत्वाची राजकीय खेळी केली आणि भाजपाचा मार्ग अधिक खडतर केला.
५) राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारले हा देखील धर्मनिरपेक्ष आघाडीच्या विजयातील एक महत्वाचा मुद्दा आहे.
६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या आधारावर भाजप ही निवडणूक लढवत होती. लोकसभा निवडणुकीच्यावेळी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांची पार्श्वभूमी त्यांच्यामागे होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपाकडे नितीश कुमार यांच्या विरोधात कोणताही सशक्त चेहरा नव्हता. मोदी दिल्लीत राज्यात काय ? हा प्रश्न मतदारांसमोर होता.
७) एकेकाळी राज्यस्तरावरील नेतृत्व भाजपची शक्ती असायचे. पण केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून राज्यस्तरावरील नेत्यांचे महत्व कमी झाले असून, नरेंद्र मोदी यांच्याभोवती नेतृत्व केंद्रीत झाले आहे. बिहार निवडणुकीत बिहारने राज्य स्तरावरील सक्षम नेतृत्व पुढे आणल नाही. त्याचा फटका भाजपाला बसला.
८) बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना हरियाणात फरीदाबादमध्ये झालेल्या दलित हत्याकांडासंबंधात केंद्रीय मंत्री व्हि.के.सिंह यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी या हत्याकांडाची कुत्र्याशी तुलना केली होती. कुत्र्यावर दगड मारला म्हणून सरकारला कसे जबाबदार धरता येईल ? असे विधान त्यांनी केले होते. त्याचाही मोठा फटका भाजपाला बसला.
९) नितीश कुमारांनी फक्त मोठया सभांवर लक्ष केंद्रीत न करता जास्तीत जास्त मतदारांशी संर्पक साधण्यावर भर दिला. छोटया सभांनाही त्यांनी संबोधित केले. ज्याचा फायदा त्यांना मिळाला.
१०) नितीश कुमारांची लोकप्रियता हे देखील विजयाचे एक कारण आहे. कायदा-सुव्यवस्था दुरुस्त करण्यासह मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी अनेक अभिनव कल्पना राबवल्या. निवडणूकपूर्व बहुतांश सर्वेक्षण चाचण्यांमध्येही मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्या नावाला पसंती होती.
११) भाजपाचे घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे जितनराम मांझी यांच्यामध्ये दलिताचा खरा नेता कोण यावरुन अंतर्गत स्पर्धा सुरु होती. तिकीटवाटपाच्यावेळीही दोघांनी आपली नाराजी जाहीरपणे प्रगट केली होती. त्याचा फटकाही भाजपाला बसला.