मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो जणांचे बळी घेणारा याकूब मेमनला गुरुवारी सकाळी सात वाजता फाशी देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली- मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो जणांचे बळी घेणारा याकूब मेमन याला गुरुवारी सकाळी ७ वाजता नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फासावर चढवले जाणार आहे.
याकूबने फाशी टाळण्यासाठी अखेरपर्यंत केलेले सर्व प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने फोल ठरवले. त्याच्या फाशीच्या मार्गातील सर्व कायदेशीर अडथळे दूर करून टाडा न्यायालयाने जारी केलेले मृत्यूचे वॉरंट योग्यच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यातच फाशी टाळण्यासाठी केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती, राज्यपालांनी फेटाळून लावल्याने त्याच्या उरल्या सुरल्या आशाही धुळीस मिळाल्या. बॉम्बस्फोट घडवून हजारो नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणा-या गुन्हेगाराला फाशी होणार असल्याने देशात समाधान पसरले आहे.
फाशी टाळण्यासाठी याकूबने सर्वोच्च न्यायालयात दुसरी याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्रा, न्या. प्रफुल्लचंद्र पंत आणि अमिताव रॉय यांच्या पीठाने सांगितले की, राष्ट्रपतींनी पहिला दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यावर न्यायालयात कायद्याने दाद मागता येत नाही. तसेच टाडा न्यायालयाने ३० एप्रिल रोजी याकूबच्या नावाचे मृत्यूचे वॉरंट बजावताना सर्व कायदेशीर बाबींचा विचार केला आहे. या वॉरंटमध्ये न्यायालयाने ३० जुलै रोजी फाशी देण्यास सांगितले होते. त्यामुळे ही याचिका कोणत्याच निकषावर टिकू शकत नाही. त्यामुळे ती फेटाळण्यात येत आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
टाडा न्यायालयाने जारी केलेले मृत्यूचे वॉरंट जारी करताना कोणतेही कायदेशीर चूक झालेली नाही, असे नमूद करून पीठाने २७ मे २०१५ रोजी झालेल्या शबनम प्रकरणाचा हवाला दिला. निकालापूर्वी वॉरंट जारी झाल्यास त्याचा पूर्वलक्ष्यी प्रभावाने परिणाम होत नाही. मृत्यूचे वॉरंट काढण्यापूर्वी संबंधित गुन्हेगाराला त्याबाबतची योग्य ती नोटीस देण्यात येते. त्यामुळे संबंधित गुन्हेगार आपल्या वकीलाशी याबाबत सल्लामसलत करू शकतो. राज्य सरकारने या प्रकरणी १३ जुलै रोजी त्याच्या फाशीचा निर्णय घेतला होता. त्याने सुधार याचिका २२ मे रोजी याचिका दाखल केली होती. त्यामुळे त्याच्या याचिकेचा विचार केला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
राष्ट्रपतींनी याकूब मेमनचा दयेचा अर्ज ४ एप्रिल २०१४ मध्ये फेटाळला होता. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर गुन्हेगाराला सर्वोच्च न्यायालयात दादही मागता येत नाही. मात्र, २२ जुलै २०१५ रोजी त्याने पुन्हा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला. तसेच राज्याच्या राज्यपालांकडेही त्याने दयेचा अर्ज केला. राष्ट्रपती व राज्यपालांचा निर्णय होईपर्यंत मृत्यूच्या वॉरंटची अंमलबजावणी करता येणार नाही, असे मेमनच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मृत्यूचे वॉरंट काढताना प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचे दरम्यान, मेमनचे वकील राजू रामचंद्र यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
नागपूर तुरुंगात फाशीची तयारी पूर्ण
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकूब मेमन याला फासावर लटकवण्याची सारी तयारी नागपूर तुरुंग प्रशासनाने केली आहे. याकूबला फासावर लटकवण्यासाठी खास बिहारमधून ‘मनिला’ प्रकारचा दोर आणण्यात आला आहे. मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाबला ज्याने फाशी दिली होती; तोच ‘जल्लाद’ गुरुवारी सकाळी ७ वाजता याकूबला फाशी देईल.
सुप्रीम कोर्ट आणि राज्यपालांनी अर्ज फेटाळल्याने याकूबची फाशी कायम झाली आहे. राज्यपालांच्या आदेशाच्या प्रती घेऊन खास दूत नागपुरात बुधवारी संध्याकाळी उशिरा पोहोचले आहेत. फाशीनंतर तात्काळ तुरुंगातल्या दवाखान्यात याकूबच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल. याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या हातात द्यायचा की तुरुंगाच्या परिसरात त्याचा अंत्यविधी उरकायचा, याचा निर्णय तुरुंगाधिकारी परिस्थिती पाहून घेतील.
दरम्यान, याकूबचा भाऊ सुलेमान याने बुधवारी दुपारी तुरुंगात जाऊन याकूबची भेट घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागपूर तुरुंगात आणि बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर खास जवानांचे पथक कारागृहात तैनात करण्यात आले आहे. तुरुंग विभागाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांनी या सगळय़ाची जातीनिशी पाहणी केली आहे.
असा असतो फाशीचा दिवस!
याकूब मेमनचे गुरुवारचे आयुष्य केवळ सुमारे दोन ते तीन तासांचे असेल. ‘डेथ वॉरंट’मध्ये फाशीची वेळ सकाळी सात वाजताची आहे. या वेळेच्या आसपासच फाशी होईल, फाशीच्या वेळेच्या साधारण दोन तास आधी फाशी देण्यात येणा-या माणसाला उठवले जाते. त्याप्रमाणे रात्री अडीच व पावणे चारच्या दरम्यान जेलचे अधिकारी याकूबला उठवतील. जेलर आणि दंडाधीकारी त्याला फाशीचा आदेश वाचून दाखवतील. त्याला आंघोळ घालून नवे कपडे नेसवले जातील. त्यानंतर त्याला प्रार्थना करायची असेल तर धर्मग्रंथ दिला जाईल. त्याच्या आवडीचा भरपेट नाश्ता दिला जाईल. त्याला त्याची अंतिम इच्छा विचारली जाईल. याकूबला जिथे फासावर दिले जाणार आहे; ती जागा याकूब जिथे आहे तिथून अवघ्या १५ पावलांवर आहे. चेह-यावर काळे कापड टाकून त्याला फाशीच्या स्थळी नेले जाईल. सोबत दंडाधिकारी आणि डॉक्टर राहतील. दंडाधिकारी इशारा होताच जल्लाद फाशीचा खटका ओढेल.