मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट मालिकेत गुन्हेगार याकूब मेमनची फाशीची शिक्षा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच देशभरातील अनेक नामवंतांना त्याचा कळवळा येऊ लागला आहे.
नवी दिल्ली- मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट मालिकेत गुन्हेगार याकूब मेमनची फाशीची शिक्षा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच देशभरातील अनेक नामवंतांना त्याचा कळवळा येऊ लागला आहे. ३०० नामवंतांनी थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे याकूबची फाशी रद्द होण्यासाठी रविवारी आपल्या सहीनिशी अर्ज केला आहे.
टाडा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेनुसार याकूब मेमनला ३० जुलै रोजी फासावर चढवले जाणार आहे. त्याची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी १५ पानांचा अर्ज देशातील नामवंतांनी सहीनिशी राष्ट्रपतींकडे दिला आहे. फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर कटिबद्धता दाखवून दिली आहे. त्यामळे भारतात फाशीची शिक्षा देणे बंद करावे, असे या नामवंतांनी सांगितले.
माजी कायदामंत्री राम जेठमलानी, मणिशंकर अय्यर, भाजपाचे शत्रुघ्न सिन्हा, खासदार माजीद मेमन, खासदार सीताराम येचुरी, प्रकाश करात, खासदार डी. राजा, वृंदा करात, अभिनेते नसरुद्दीन शहा, महेश भट्ट, तुषार गांधी, माजी न्या. एच. एस. बेदी, न्या. पी. बी. सावंत, न्या. एच. सुरेश, न्या. एस. एन. भार्गव, नामवंत वकील इंदिरा जयसिंग, शिक्षणतज्ज्ञ इरफान हबीब, अर्जुन देव, डी. एन. झा, सामाजिक कार्यकर्ते अरुणा रॉय, जीएन ड्रीज, जॉन दायल आदींचा समावेश आहे.
दुस-या बाजूला, अतिसंवेदनशील मानल्या जाणा-या नागपुरात अंडरवर्ल्डवाले कुठलीही गडबड करू शकतात या शक्यतेने सुरक्षा यंत्रणेवरचा ताण कमालीचा वाढला आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मेमनची फाशीच्या शिक्षेबाबतची सुधार याचिका फेटाळल्यानंतर त्याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अपिल केले होते.
नागपुरात फाशीकल्लोळ
नागपूर- १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला अवघे चार दिवस उरले असताना नागपुरात फाशीकल्लोळ माजला आहे. सुप्रीम कोर्टात आज सोमवारी याकूबच्या आयुष्याचा फैसला आहे. राज्यपाल विद्यासागर राव हेही त्याच्या दया अर्जावर निकाल देतील.
या पार्श्वभूमीवर याकूबला फाशी देऊ नये अशी मागणी करणा-यांच्या पंगतीत सिनेस्टार सलमान खान याने उडी घेतल्याने वेगळेच वातावरण तयार होऊ पाहते आहे. काही होणार नाही तो भाग वेगळा, पण या फाशीला राजकीय आणि धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न होत असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
दुस-या बाजूला, अतिसंवेदनशील मानल्या जाणा-या नागपुरात अंडरवर्ल्डवाले कुठलीही गडबड करू शकतात या शक्यतेने सुरक्षा यंत्रणेवरचा ताण कमालीचा वाढला आहे. त्यातूनच याकूबला फाशीसाठी पुण्याला हलवणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. आजचे निकाल आल्यानंतर याकूब कायद्याची आणखी कुठली नवी चाल खेळतो की मान टाकतो याकडे देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष आहे. फाशीनंतर नागपुरातील परिस्थिती काय असेल याचा आढावा गुप्तचर यंत्रणांकडून घेतला जात आहे. अलर्टही देण्यात आला आहे.
पोलीस, दहशतविरोधी पथक आणि गुप्तचर यंत्रणा नागपूरच नव्हे तर मुंबईवर लक्ष ठेवून आहेत. याकूबला जिथे ठेवले आहे त्या नागपूर तुरुंग परिसरात पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. तुरुंगाच्या आत आणि बाहेर जास्तीचे सशस्त्र रक्षक तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर साध्या वेशातील पोलीस बाहेरून येणा-या लोकांवर लक्ष ठेवत आहेत.
बाहेर कितीही आरडाओरडा सुरू असला तरी, नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या दगडी भिंतीआड फाशीची तयारी जोरात सुरु आहे. ३० जुलैला याकुबला लटकवायचे आहे असे मानून सारे कामाला भिडले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर येथे तळ देऊन आहेत. अधिकारयांची बैठक घेऊन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. फाशी यार्डचीही पाहणी केली.
१९८४ नंतर प्रथमच इथे कुणाला लटकवले जात आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासन कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही. वरच्या बाजूला उघडे असलेले फाशी यार्ड आता २३ लाख रुपये खर्चून सर्व बाजूने लोखंडी जाळीने सील करण्यात येत आहे. तीन वर्षापूर्वी ज्या ‘जल्लाद’ने पुण्यातील येरवडा तुरुंगात मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फासावर दिले, त्याच्याचकडे याकूबचे काम दिले आहे.
फासावर द्यायचा खास ‘मनिला’ दोर बिहारमधल्या बक्सर जेलमधून येथे येऊन पोहोचला आहे. मुंबई पोलिसांची डोकेदुखी वेगळी आहे. याकूबचा दफनविधी, मुंबईत तो राहतो त्या माहीम किंवा डोंगरी भागात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या मुंबईचे पोलीसही कामाला लागले आहेत.