इशांतचे पाच बळी; भारतासमोर १९४ धावांचे लक्ष्य
बर्मिगहॅम – इंग्लंड दौ-यातील पहिली कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर १९४ धावांचे लक्ष्य आहे. तिस-या दिवशी यजमानांचा दुसरा डाव १८० धावांत आटोपला. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (५१-५) याने निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये धाडला. त्याला ऑफस्पिनर आर. अश्विन (३ बळी) आणि वेगवान गोलंदाज उमेश यादवची (२ बळी) चांगली साथ लाभली.
पहिल्या डावात १३ धावांची नाममात्र आघाडी घेणा-या इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. १ बाद ९ धावांवरून पुढे खेळताना यजमानांनी तिस-या दिवशी शुक्रवारी सलामीवीर कीटन जेनिंग्ज (८) आणि कर्णधार ज्यो रूट (१४ धावा) यांना लवकर गमावले. ३ बाद ३९ धावांवरून डॅविन मॅलन (२०) आणि जॉनी बेअस्टरे (२८) यांनी चौथ्या विकेटसाठी ३१ धावा जोडताना संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपाहारापूर्वी इशांतने मॅलन याला बाद करून जोडी फोडली. त्यानंतर एकाच षटकात बेअस्टरे आणि बेन स्टोक्स (६) यांना बाद करताना इंग्लंडची अवस्था ७ बाद ८७ धावा अशी केली.
यजमानांची ‘शंभरी’ भरली, असे वाटत असतानाच आठव्या क्रमांकावरील अष्टपैलू सॅम कुरॅन संघाच्या मदतीला धावला. त्याने कारकिर्दीतील दुस-या कसोटीत वैयक्तिक पहिले अर्धशतक झळकावताना इंग्लंडला दोनशेच्या घरात नेले. कुरॅन याने ६५ चेंडूंत ६३ धावांचे योगदान दिले. त्यात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. कुरॅन याला अब्दुर रशिद (१६) आणि स्टुअर्ट ब्रॉड (११) या तळातील फलंदाजांची साथ लाभली. दुस-या सत्रात पावसाने थोडा व्यत्यय आणला, तरी इंग्लंडचा दुसरा डाव १८० धावांमध्ये संपवण्यात भारताला यश आले.
पाहुण्यांतर्फे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने अचूक आणि प्रभावी मारा करताना ५१ धावांमध्ये निम्मा संघ गारद केला. ऑफस्पिनर आर. अश्विन (५९-३) आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव (२०-२) यांची त्याला सुरेख साथ लाभली.
भारत ३ बाद ६२
१९४ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने तिस-या सत्रात ३ बाद ६२ धावा केल्या. शिखर धवन (१३) आणि मुरली विजयने (६) सावध सुरुवात केली तरी दोन धावांच्या फरकाने सलामी जोडी परतली. लोकेश राहुल (१३) स्थिरावतोय, असे वाटत होते. मात्र त्यालाही मोठी खेळी करण्यात अपयश आले.