सध्याच्या स्पर्धात्मक युगात अनेक जण आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात.
मुंबई- सध्याच्या स्पर्धात्मक युगात अनेक जण आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा या आजारांबरोबरच अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे मुंबईत १००पैकी सरासरी २० ते ४० जणांच्या यकृतातील मेदाचे (फॅटी लिव्हर) प्रमाण वाढत आहे.
तसेच शहरी जीवनशैलीमुळे लहान वयातच जवळपास ३५ टक्के मुलांत लठ्ठपणा वाढत असल्याचे दिसून येत असल्याने तरुण वयात यकृतातील मेदाचे प्रमाण वाढत असल्याचे ग्लोबल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
यकृताच्या विकारांवरील जनजागृतीसाठी दरवर्षी १९ एप्रिल हा दिवस ‘जागतिक यकृत दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर परळ येथील ग्लोबल रुग्णालयात गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांच्या यकृतातील मेदाचे प्रमाण वाढत असल्याबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली.
भारतात दरवर्षी २ लाख लोक यकृत निकामी झाल्यामुळे मृत्यू पावतात. केवळ मद्यपानामुळे यकृत खराब होत नाही तर जीवनशैलीही निगडित आजार, अनुवंशिकता यामुळेही यकृतातील मेदाचे प्रमाण वाढते आहे. यापैकी जवळपास ६० टक्के एनएएफएलडी (नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हर डिसिज) तर ४० टक्के दारू चे व्यसन असल्यामुळे यकृतात मेदाचे प्रमाण वाढत असल्याचे रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण विभागाचे मुख्य शल्यविशारद डॉ. रवी मोहंका यांनी सांगितले.
हेपॅटायटीस बी करता उपलब्ध असलेली लस आणि हेपॅटायटीस बी व सी करता केले जाणारे परिणामकारक औषधोपचारांमुळे यकृत निकामी होण्याच्या घटना कमी होऊ लागल्या आहेत, परंतु अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारांमुळे कर्करोगही होण्याची शक्यता असते. यकृताच्या कर्करोगामुळे होणा-या मृतांच्या आकडय़ातही वाढ होते आहे, असेही डॉ. मोहंका यांनी सांगितले.
यकृत हा मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, परंतु ५० टक्के समस्या या यकृतात मेदाचे प्रमाण वाढल्यामुळे निर्माण होतात. त्यामुळे अनेकदा यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते. याशिवाय हेपॅटायटीस बी किंवा सी यापेक्षाही यकृतात मेदाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने मधुमेहानंतर भारतात यकृताचा आजार ९ व्या स्थानावर आहे, असे रुग्णालयाच्या प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. समीर शाह यांनी सांगितले.
तरुणांत यकृत निकामी होण्याचे प्रमाण अधिक
दारू शरीराला हानिकारक असतानाही जगातील सर्वच देशांत तरुणांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत दारू पिणा-यांचे प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०१४ मध्ये भारतात ३३ लाख लोकांचा मृत्यू दारूमुळे झाला होता. तर १५-२० वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूसाठी दारू हेच प्रमुख कारण होते.
याबाबत बोलताना कालसेकर रुग्णालयाचे लेप्रोस्कोपिक शल्यविशारद डॉ. किशोर नाईक म्हणाले की, दारूचे सेवन केल्यामुळे यकृतात चरबीचे प्रमाण वाढत राहिल्यामुळे यकृत निकामी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दारू पिण्याचे सरासरी वय भारतात २७ वर्षे होते, मात्र सध्याच्या बदलत्या युगात १७ वर्षातील तरुणही बिनधास्त दारूच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यामुळे तरुणांत यकृत निकामी होण्याची भीती अधिक प्रमाणात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात ६० कोटी लिटर मद्यनिर्मिती केली जाते व तेवढीच खपवलीसुद्धा जाते. त्यामुळे आज कोणत्याही खासगी किंवा सरकारी रुग्णालयात जा; तेथे १० ते १२ टक्के रुग्ण हे यकृत निकामी झाल्याने त्रस्त आहेत. त्यामुळे दारूचा प्रसार आणि प्रचार रोखण्यासाठी राज्य स्तरावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही डॉ. नाईक यांनी सांगितले.