चालू आर्थिक विकासात ८ टक्के विकासदराच्या गमजा मारल्या जात असतानाच पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी त्याच्या जवळपासही जाणारी नाही.
नवी दिल्ली- चालू आर्थिक विकासात ८ टक्के विकासदराच्या गमजा मारल्या जात असतानाच पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी त्याच्या जवळपासही जाणारी नाही. एप्रिल-जून या कालावधीत अवघा ७ टक्केच विकासदर गाठण्यात अर्थव्यवस्थेला शक्य झाले असून कृषी, सेवा आणि उत्पादन क्षेत्राच्या निराशाजनक आकडेवारीचा फटका बसला. मात्र यामुळे या वर्षातील विकासदराच्या अंदाजाबाबतच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
औद्योगिक उत्पादनांच्या धीम्या गतीबरोबरच पहिल्या तिमाहीतील जीडीपीतील वाढही मंदावल्याने आरबीआयकडे रेपोदर कपातीसाठीची मागणी आणखी जोर धरणार आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने सुरू केलेली ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड (जीव्हीए) ही नवी मापनपद्धतीनुसारही पहिल्या तिमाहीत विकासदर ७.४ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांपर्यंत मंदावला. तर जीडीपीमध्ये जानेवारी-मार्च या तिमाहीत ७.५ टक्के वाढ वाढ झाली होती. तर गेल्या वर्षी या तिमाहीत ६.७ टक्के विकासदर नोंदवला होता, असे सीएसओने म्हटले आहे.
सरकारने चालू आर्थिक वर्षात ८.१ टक्के ते ८.५ टक्के विकासदर गाठण्याचा विश्वास वर्तवला आहे. मात्र पहिल्या तिमाहीतील आकडेवारी पाहिल्यास हे लक्ष्य खूपच आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.
सध्याच्या बाजारभावानुसार नॉमिनल जीडीपी आणि जीव्हीएमध्ये वर्षागणिक पहिल्या तिमाहीत मोठी घट झाली आहे. या तिमाहीत नॉमिनल जीडीपी १३.४ वरून ८.८ टक्क्यांवर, तर जीव्हीए १४ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांवर घसरला आहे.
पहिल्या तिमाहीत कृषी आणि संबंधित क्षेत्राच्या उत्पादनात अवघी १.९ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या क्षेत्राची २.६ टक्क्यांनी वाढ झाली होती. याबरोबरच वीज, वायू, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा यांची १०.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर घसरण झाली.
पायाभूत उद्योगांची चालही धीमी
प्रमुख आठ पायाभूत उद्योगांचा विकास जुलैमध्ये तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. या महिन्यामध्ये या उद्योगांनी अवघी १.१ टक्का वाढ नोंदवली. कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि पोलाद उद्योगाच्या उत्पादनात घट झाली. गेल्या वर्षी या उद्योगांनी ४.१ टक्के एवढी वाढ नोंदवली होती. वाणिज्य आणि उद्योग खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि पोलाद यांच्या उत्पादनात अनुक्रमे ०.४ टक्के, ४.४ टक्के आणि २.६ टक्के घट झाली. तर कोळसा, सिमेंट आणि वीज यांचे उत्पादन अनुक्रमे ०.३ टक्के, १.३ टक्के आणि ३.५ टक्क्यांवर मंदावले.
अर्थसंकल्पीय अंदाजाच्या वित्तीय तूट ६९.३ टक्के
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये वित्तीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ६९.३ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ६१.२ टक्के एवढे होते. एप्रिल ते जुलै या कालावधीत ३.८५ लाख कोटी रुपयांवर ही तूट गेली असून सरकारने नियोजित खर्चासाठी पावले उचलण्यास सुरुवात केल्याचा परिणाम या तुटीवर झाला. संपूर्ण वर्षभरात ५.५५ लाख कोटी रुपयांवर वित्तीय तूट रोखण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. या कालावधीत सरकारने करमहसुलातून १.५४ लाख कोटी मिळवले, तर ६ लाख कोटी रुपये खर्च केले. संपूर्ण वर्षाच्या एकूण खर्चाच्या अंदाजाच्या ३३.८ टक्के एवढे हे प्रमाण आहे.
महागाईतील घसरण, तेल आणि इतर वस्तूंच्या कमी होणा-या किमतीही घटल्या आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाची कामगिरी फारशी समाधानकारक नसली तरी जुलैमधील कामगिरीच्या जोरावर कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढेल अशी परिस्थिती आहे. येत्या काळात रिझव्र्ह बँक याची दखल घेऊन व्याजदर कपात करेल, अशी आशा आहे.- अरुण जेटली, अर्थमंत्री