पावसाने केलेल्या असमाधानकारक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर देशातील तांदळाचे उत्पादन यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या विक्रमी उत्पादनाच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता इंटरनॅशनल ग्रेन काउन्सिल (आयजीसी)ने व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली – पावसाने केलेल्या असमाधानकारक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर देशातील तांदळाचे उत्पादन यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या विक्रमी उत्पादनाच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता इंटरनॅशनल ग्रेन काउन्सिल (आयजीसी)ने व्यक्त केली आहे. देशांतर्गत तसेच निर्यातीची मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक पुरवठ्याची स्थिती मात्र सुसह्य पातळीवर राहणार असल्याचे ‘आयजीसी’ने म्हटले आहे.
यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला असून, देशातील तांदळाचे उत्पादन बहुतांशी पावसावरच अवलंबून आहे. यामुळे २०१२-१३ या विपणन वर्षातील (ऑक्टोबर-सप्टेंबर) तांदळाचे उत्पादन नऊ कोटी ९८ लाख टनच होईल, असा अंदाज आयजीसीने आपल्या अहवालात वर्तवला आहे. दरम्यान, आयजीसीचा अंदाज हा इतर जागतिक संस्थांनी अंदाजित केलेल्या उत्पादनापेक्षा अधिक आहे. गेल्या हंगामात १० कोटी ४३ लाख टन तांदळाचे उत्पादन झाले होते.
संयुक्त राष्ट्रांची संस्था असलेल्या फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ)ने देशात यंदा नऊ कोटी ८५ लाख तांदळाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अमेरिकेच्या कृषी विभागाने नऊ कोटी ९० लाख टन तांदूळ उत्पादन होईल, असे म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या विक्रमी उत्पादनापेक्षा तांदळाचे उत्पादन चालू हंगामात कमी राहणार असले तरी पुरवठ्याच्या पातळीवर मात्र कोणतीच समस्या येणार नाही. देशात नऊ कोटी ५० लाख तांदळाची वार्षिक मागणी आहे. या तुलनेत देशात १२ कोटी १४ लाख टन तांदूळ साठा असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामुळे ६९ लाख टन तांदळाची निर्यातही देशातून होणे शक्य असल्याचे यात नमूद केले आहे.