बालकांवर आणि महिलांवर मोबाईलमुळे बलात्कार होतात, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी केले आहे.
लखनौ- बालकांवर आणि महिलांवर मोबाईलमुळे बलात्कार होतात, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी केले आहे. दिल्ली येथे सतत घडणा-या गुन्हेगारीवर बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.
त्यांच्यामते अडीच वर्षाच्या छोट्या मुलींवर बलात्कार होतात, यामागे मोबाईलच जबाबदार आहे. मोबाईल फोनवर इंटरनेटच्या सहाय्याने घाणेरड्या क्लिप डाउनलोड केल्या जातात आणि ते पाहून बलात्कार होतात, असे ते म्हणाले.
त्यांच्या या विधानावर सोशल मिडियावर जोरदार टिका केली जात आहे. त्यांच्या या विधानाचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. परंतु ते मात्र त्यांच्या मतावर ठाम आहेत. मोबाईलमध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफी बघता येऊ शकते त्यामुळेच दिल्लीमध्ये नुकतेच बलात्कार झाल्याचे ते सांगतात.
यापूर्वी, खाप पंचायतीने महिला परिधान करत असलेल्या छोट्या आणि तंग कपड्यांमुळे बलात्कार होतात असे म्हटले होते.
तसेच केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या ‘जर एखाद्याने कुत्र्याला दगड मारला तर त्यात सरकारचा काय दोष?, या धक्कादायक विधानावर बोलताना त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१३ मध्ये केलेल्या एका विधानाशी केली. यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही, कारण हीच भाजपाची संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी त्यावेळी पिल्लू म्हटले होते, त्याचा आता कुत्रा झाला आहे. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तेव्हा मोदी यांना गुजरात दंगलीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी गाडीच्या चाकाखाली पिल्लू आले तरी दु:ख होते, दंगलीत तर माणसे मारली गेली, असे खळबळजनक विधान केले होते. ही भाजपा आणि संघाची संस्कृती असल्याचे सांगून त्यांनी व्ही. के. सिंह यांची खिल्ली उडवली.
पहिल्यांदा दादरी, मग दलित प्रकरणाची देशभर चर्चा सुरु आहे. बीफवरुन एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केले जात आहे. भाजपा आणि संघाची ही भूमिका देशात अराजकता निर्माण करत असल्याचे ते म्हणाले.