भारताचा मोस्ट वॉंटेड गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवरुन केंद्र सरकारवर आज नामुष्कीची वेळ ओढवली.
नवी दिल्ली – मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाण्याबाबत मोदी सरकारमध्येच गोंधळ आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी लोकसभेत, दाऊदचा ठावठिकाणा आम्हाला माहीत नसल्याचे सकाळी सांगून मोकळे झाले. प्रश्नोत्तराच्या तासात दाऊद कुठे आहे, असा प्रश्न भाजपाचे खासदार नित्यानंद राय यांनी विचारला होता. तर अवघ्या सहा तासांत दुसरे गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दाऊद हा पाकिस्तानातच राहत असल्याचे ठामपणे सांगितले.
दाऊदला पाकिस्तानने आश्रय दिला असल्याचे जगजाहीर असताना मंगळवारी संसदेत, दाऊद कुठे आहे, याची काहीच कल्पना नसल्याचे सरकारने सांगितल्यावर संपूर्ण देशात गोंधळ उडाला.
डिसेंबर २०१४ मध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी दाऊद पाकिस्तानात असून कराचीमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मंगळवारच्या वक्तव्यानंतर सरकारची परस्परविरोधी भूमिका उघड झाली. १९९३ साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी दाऊदविरोधात सबळ पुरावे देत दाऊदला ताब्यात देण्याची मागणी त्यावेळी भारताने पाकिस्तानकडे केली होती.
तर गेल्या नोव्हेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दाऊद अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर असून पाकिस्तानने त्याला आश्रय दिल्याचाही आरोप केला होता. मात्र दाऊदबाबतच्या सरकारच्या या नव्या भूमिकेने तपासयंत्रणांच्या क्षमतेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दाऊदला पकडण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने विशेष नोटीस त्याच्या विरोधात जारी केली आहे.
आज पुन्हा निवेदन
केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांच्याशी चर्चा करून बुधवारी संसदेत याबाबत पुन्हा निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
मोदी सरकारचे उत्तर आयएसआयसारखेच
दाऊद नेमका कुठे आहे, हे आम्हाला माहिती नाही, असा दावा पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय करत असते. त्याचाच कित्ता केंद्र सरकारने गिरवला असून ही बाब अत्यंत धक्कादायक आहे, अशी टीका कॉँग्रेसचे प्रवक्ते गौरव गोगोई यांनी केली आहे.