जेव्हापासून मोदी सरकार आले आहे तेव्हापासून दहशतवादाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.
मुंबई- जेव्हापासून मोदी सरकार आले आहे तेव्हापासून दहशतवादाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.
मालेगावात जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा एटीएसचे जिगरबाज अधिकारी हेमंत करकरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यावेळी त्यांना कळाले की या स्फोटासाठी ज्या मुस्लिम धर्मीयांना जबाबदार धरले जात होते. त्यांचा या प्रकरणाशी काहीएक संबंध नव्हता.
या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक सहभागी होते. हे सर्व षड्यंत्र होते. या चौकशीत कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह यांची नावे पुढे आली. साध्वी प्रज्ञा सिंह या पूर्ण षड्यंत्राच्या मुख्य सूत्रधार होत्या. या बॉम्बस्फोटासाठी लागणारे आरडीएक्स कर्नल पुरोहित यांनीच पुरवले होते, असेही निरुपम यांनी सांगितले.
हेमंत करकरे नितीन गडकरींना भेटले. त्यावेळी ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. हेमंत करकरेंनी या प्रकरणाची सर्व माहिती गडकरींना दिली व सर्व भाजपा नेत्यांची तोंडे बंद झाली. पण आता सरकार बदलले व चौकशीची दिशाच बदलली आहे.
मोदी सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)चा दुरुपयोग करत आहे. एनआयएच्या माध्यमातून मोदी सरकार आणि आरएसएस जे षड्यंत्र करत आहेत. त्यात आम्ही याचा पर्दाफाश करू. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी नुकत्याच आलेल्या निकालाविरोधात काँग्रेस न्यायालयात जाईल, असेही निरुपम यांनी सांगितले. तर पीडितांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देणारच, अशी ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांचे नातेवाईक आझाद मैदानात आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसले होते. या वेळी आमदार असलम शेख, अल्पसंख्याक मुंबई विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन राईन, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सय्यद अहमद, प्रदेश प्रवक्ते अल-नासीर झकेरिया उपस्थित होते. या वेळी शहीद हेमंत करकरे यांच्या स्मृतीला मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.