विरोधी पक्षांनी बुधवारी नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवली.
नवी दिल्ली- विरोधी पक्षांनी बुधवारी नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवली. सत्तेवर येताना जनतेला भुरळ पाडणारी अनेक आश्वासने दिल्यानंतरही जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडणा-या किमती व गरिबांना न्याय देण्यामध्ये हा अर्थसंकल्प अपयशी ठरला असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली.
२०१४-१५ या वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बुधवारी लोकसभेत चर्चा झाली. या वेळी विरोधी पक्षांनी रालोआ सरकारची चहूबाजूंनी कोंडी केली. यूपीए सरकारने पाठीमागे ठेवलेल्या समृद्ध वारशाच्या आधारे अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यामध्ये अपयश आल्यावर त्याचे खापर यूपीए सरकारवर फोडण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
महागाई रोखण्यासाठी सरकारच्या कटिबद्धतेबाबत राष्ट्रपतींच्या भाषणात वारंवार उल्लेख असूनही, अर्थसंकल्पात मात्र, तशा प्रकारचे कोणतेही उपाय नसल्याचे काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. काँग्रेसच्या अर्थसंकल्पांचीच नक्कल या अर्थसंकल्पात केली असल्याचे सांगत, दुस-याची नक्कल हा खुशामतीच्या प्रकारांपैकीच एक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.