बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणा-या नरेंद्र मोदी आणि भाजपावर कन्हैया कुमार याने नागपुरातील सभेत सडकून टीका केली.
नागपूर- बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणा-या नरेंद्र मोदी आणि भाजपावर कन्हैया कुमार याने नागपुरातील सभेत सडकून टीका केली. तो म्हणाला, अलीकडे बरेच लोक बाबासाहेबांचे नाव घेत आहेत. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. मोदी आणि संघ परिवारात हिंमत असेल तर त्यांनी मनुस्मृती जाळून दाखवावी.
जय भीम, अशी घोषणा देऊन कन्हैयाने आपले भाषण सुरू केले. तो म्हणाला, काही लोक भारतमाता की जय म्हणतात. पण मग महिलांवरील अत्याचारांचे काय? त्याबद्दल ते बोलत नाहीत. समाजवादावर त्यांचे काय म्हणणे आहे? हिंदू कोड बिलबद्दल त्यांची काय भूमिका आहे? घोषणा देऊन देश चालत नसतो.
गणवेष बदलल्याने विचारधारा बदलत नसते. देशविरोधी शक्तींना आमचा पाठिंबा नाही. पण इंग्रजांची चमचेगिरी करणारे, देश लुटणारे, कित्येक वष्रे तिरंगा न फडकवणारे आज आम्हाला देशभक्तीचे धडे द्यायला निघाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी खूप आश्वासने दिली. काळा पैसा आणतो म्हणाले. काहीही केले नाही. दुष्काळाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही.
मोदीभक्ती म्हणजे देशभक्ती नाही. मोदी म्हणजे देश नाही, संघ म्हणजे संसद नाही आणि मनुस्मृती म्हणजे घटना नाही. आम्ही सरकारच्या विरोधात नाही. पण हे सरकार ज्या योजना आणत आहेत, त्यांच्या विरोधात आहोत. या योजनांमुळे गरीब आणखी गरीब होत चालले आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर बांधण्यासाठी हे यात्रा काढतात.
गरिबी हटवण्यासाठी यात्रा का काढत नाहीत? कारण यांना देश तोडायचा आहे. आवाज चढवून कन्हैया म्हणाला, अध्र्या टक्का लोकांवर आज एक त्रितीयांश पैसा खर्च होतो. कुठे आहे लोकशाही? सामाजिक लोकशाही आणावी लागेल. त्यासाठी जन आंदोलनांची गरज आहे. मनुवादी व्यवस्थेला हरवूनच खरे स्वातंत्र्य येऊ शकेल. यांना लाज वाटायला पाहिजे. यांना आयपीएलची चिंता आहे.
पण २०-२० मैलांवरून पाणी आणणा-या आया-बहिणींची चिंता नाही. किमान प्यायला पाणी तर द्या. सामान्य माणूस आपल्या हक्कासाठी जागा होतो आहे. समाज परिवर्तनाची ही लढाई आहे. मला स्वातंत्र्य पाहिजे आहे. पण ते देशात राहूनच हवे आहे. आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आणायचे आहे, असेही त्याने स्पष्ट केले.