मोदी गडी बोलायला फार हुशार. माझं बोट धरून राजकारणात आलो, असे म्हणाले तेव्हा मी तर ऐकूनच मेलो, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावली.
नाशिक- मोदी गडी बोलायला फार हुशार. माझं बोट धरून राजकारणात आलो, असे म्हणाले तेव्हा मी तर ऐकूनच मेलो, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावली तेव्हा एकच हशा पिकला. भाजपा सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही त्यांनी जोरदार टीका केली.
नाशिक येथील पिंपळगाव बसवंत येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार यांनी अनेक विषयावर जोरदार फटकेबाजी केली. विशेषत: नोटाबंदीच्या निर्णयाचा त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले की, काळा पैसा आणायला मोदी वाजतगाजत स्वित्झर्लंडला गेले. मात्र तिथून त्यांना हात हलवत परत यावे लागले. जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी मग नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीनंतर चार-पाच दिवस सहकारी बँकांनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली.
मात्र अचानक सहकारी बँकाच्या नोटा घेणार नसल्याचा आदेश निघाला. तोपर्यंत ८ हजार ६०० कोटींची रक्कम जमा झाली. त्याचे व्याज चालू झाले. पण रिझर्व्ह बँकेने नोटा घ्यायला नकार दिल्यामुळे सहकारी बँका अडचणीत आल्या. सुप्रीम कोर्टाने सहकारी बँकेच्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश देऊनही सरकारने त्या नोटा घेतलेल्या नाहीत, असेही पवार म्हणाले.
नोटाबंदी नंतर सर्वाधिक काळापैसा भाजपाशी निगडीत लोकांकडे सापडला असून आता सोने तपासण्याची वेळ आली तर ही आमची अखेरची खासदारकी असेल, असे भाजपाचे खासदार खासगीत येऊन सांगत असल्याचे पवार यांनी सांगितले. नोटाबंदीच्या बाबतीत आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. लोक सध्या गप्प आहेत म्हणजे ते वेडे नाहीत. आणीबाणीच्या वेळेला लोकं असेच गप्प होते. निवडणूकीत त्यांनी काँग्रेसचा पराभव केला होता. आज घेतलेला निर्णय हा नोटाबंदीचा आहे की नसबंदीचा आहे, हे मतदानाला गेल्यावरच लोक ठरवतात, असेही पवार म्हणाले.