वस्तू व सेवा विधेयकासह (जीएसटी) महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पुन्हा विरोधकांना शरण गेले.
नवी दिल्ली – वस्तू व सेवा विधेयकासह (जीएसटी) महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पुन्हा विरोधकांना शरण गेले. गेल्या आठवडय़ात मोदी यांनी लोकसभेत हेच आवाहन विरोधकांना केले होते.
केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर मोदी यांनी विरोधकांना सन्मानाने वागवले नाही. त्यामुळे विरोधकांच्या मनात सरकारच्या कारभारात अढी आहे. राज्यसभेत अनेक विधेयके रखडली आहेत. त्यामुळे आक्रमक मोदींनी आता सहकार्याची भाषा सुरू केली.
अभिभाषणाबद्दल राष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावर जवळपास ३०० हून अधिक सुधारणा दाखल झाल्या आहेत, त्यावर राज्यसभेत बोलताना मोदी म्हणाले की, या सुधारणा मागे घेऊन एकमताने त्या मंजूर कराव्यात. राष्ट्रपतींच्या कार्यालयाचा सन्मान राखावा तसेच सभागृहाची उच्च परंपरा कायम राखावी, असे मोदी यांनी सांगितले.
खासदारांनी कोणताही गदारोळ न घालता सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले होते, याचा दाखला मोदी यांनी दिला. विरोधकांनी राष्ट्रपतींच्या संदेशाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.कॉँग्रेसने देशात अनेक वर्षापासून राज्य केले असून रालोआला आताच सत्तेची संधी मिळाली आहे. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेत समन्वय साधणे गरजेचे आहे. लोकसभेत मंजूर झालेली विधेयके राज्यसभेत अडकली आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
राज्यसभा म्हणजे नवनवीन कल्पनांची खाण आहे. लोकसभा व राज्यसभेत समन्वय असला पाहिजे, या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विधानाचा दाखला देऊन मोदी म्हणाले की, नेहरूंच्या विचारांचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व प्रलंबित विधेयके या अधिवेशनात मंजूर करा, असे आवाहन त्यांनी केले.