बलात्काराच्या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा पोलिस खाते दिल्ली सरकारच्या ताब्यात देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
नवी दिल्ली – दिल्लीत अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा पोलिस खाते दिल्ली सरकारच्या ताब्यात देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
मोदीजी आडमुठेपणा सोडा. आपण एकत्र मिळून काम करु. दिल्लीचे पोलिस खाते आणि भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा आमच्या ताब्यात द्या. वर्षभरात परिस्थिती सुधारुन दाखवू असा दावा केजरीवालांनी टि्वटसमधून केला आहे.
दिल्लीत घडलेल्या बलात्कारांच्या घटनांमुळे केजरीवालांवर टीका होत आहे. भाजपाने केजरीवालांवर महिला सुरक्षेचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत मुलांवरील लैंगिक शोषणाच्या घटना रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसने केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून गृहखात्याच्या नियंत्रणावरुन त्यांचा केंद्र सरकारशी वाद सुरु आहे. दिल्लीत गृहखाते केंद्र सरकारच्या नियंत्रणात येते. या खात्याचे नियंत्रण दिल्ली सरकारकडे सोपवावे अशी मागणी केजरीवालांनी अनेकदा केली आहे.