भारत काँग्रेसमुक्त करण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पाहिले. पण आता ते स्वप्नच राहील अशी चिन्हे दिसत आहेत. ‘मोदीमुक्त भारता’च्या प्रवासाची सुरुवात झाली आहे.
भारत काँग्रेसमुक्त करण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पाहिले. पण आता ते स्वप्नच राहील अशी चिन्हे दिसत आहेत. ‘मोदीमुक्त भारता’च्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. ‘अच्छे दिन’ देतो असे खोटे सांगून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘बुरे दिन’ वाट पाहत आहेत. त्याची सुरुवात झाली आहे. भाजपा या आधीही फार काळ सत्तेत टिकला नाही. अटलबिहारी वाजपेयी सरकारच काय ते पाच वष्रे पूर्ण करू शकले.
वाजपेयी यांच्यासारखा सर्वसमावेशक नेता होता म्हणून भाजपाला ती सर्कस जमली. मोदी यांच्यासारख्या एककल्ली नेत्याला ते जमणे नाही. ‘पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ’ असे सांगणारे मोदी सत्तेत येताच अचानक पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लाहोरला उतरतात, याचा देशाने काय अर्थ घ्यायचा? देशाला परराष्ट्र धोरण नाही, महागाई प्रचंड वाढली, स्वस्ताईचे धोरण नाही, सहिष्णुतेशी बांधिलकी नाही. सरकार म्हणजे ढकलगाडी आहे. जागतिक नेते बनण्याच्या धुंदीत देशावरची पकड त्यांच्या हातून सुटत आहे.
दीड वर्षापूर्वी जनमानसावर त्यांचे राज्य होते. आज लोक त्यांच्याविषयी वाट्टेल ते बोलत आहेत. परवा आसामच्या एका नेत्याने तर ‘स्मृती इराणी ही त्यांची दुसरी पत्नी’ असल्याचे लोक बोलतात, असे जाहीरपणे सांगितले. खरेखोटे, काय असेल ते असो, पण लोक आता कुजबुजू लागले आहेत. मोदींसाठी ही धोक्याची घंटा आहे. लोकांमध्ये त्यांचा ग्राफ घसरू लागला आहे. लोकांमध्येच नाही तर त्यांच्या सरकारमध्येही अंतर्गत संघर्ष विकोपाला जाताना दिसतो आहे. हे सरकार आपसातल्या कलहाने पडेल आणि तो दिवस दूर नाही. २०१६ मध्ये पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. तिथे भाजपाला संधी नाही. मोदी नावाची ‘न पडणारी िभत’ दोनच वर्षात वाकू लागली आहे. कुठल्याही परिस्थितीत मोदी २०१९ साल पाहात नाहीत.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील घोटाळा हे तर निमित्त आहे. हे फटाके घरातूनच लागले आहेत. मुळात मोदींना घरातही प्रतिस्पर्धी चालत नाही. तुम्ही पाहा, राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, मनोहर पर्रिकर या मंत्र्यांना त्यांनी कसे ताटाखालचे मांजर बनवून ठेवले आहे. अरुण जेटली हेच काय ते मोदींच्या कचाटय़ातून सुटले होते. जेटली उद्या आपल्याला आव्हान देऊ शकतात अशी शंका आल्याने मोदी कामाला लागले. जेटली हे संघ परिवारातले नाहीत, त्यामुळे तसेही भाजपाला ते बाहेरचेच आहेत. त्यामुळे त्यांना अडचणीत पाहून संघ परिवार मजा घेत आहे. हवालाच्या घोटाळ्यात लालकृष्ण अडवाणी यांचे नाव आले तेव्हा त्यांनी लगेच राजीनामा फेकला होता.
‘अडवानींचे अनुकरण करा’ असा सल्ला मोदींनी जेटलींना दिला. डीडीसीएची सीबीआय चौकशी लावली. जेटली मोठे धूर्त आहेत. राजीनामा दिला तर संघवाले आपल्याला खाऊन टाकतील हे त्यांनी ओळखले. अमित शहा, व्यंकय्या नायडू आदी मंडळी वरकरणी जेटली यांच्या बाजूने बोलत आहेत. पण मोदी सरकारमधला इतर कुणी मंत्री जोरदारपणे जेटली यांच्या पाठीशी उभा असताना दिसत नाही. त्याचे तसे कारणही आहे. जेटली यांनी मित्रांपेक्षा शत्रूच अधिक कमावले. त्यामुळे अरविंद केजरीवाल, कीर्ती आझाद इथपासून काँग्रेसपर्यंत सा-यांचे बाण त्यांना झेलावे लागत आहेत. या भांडणांची मोठी गंमत आहे. पैसा कुणी खाल्ला हे अखेपर्यंत समोर येत नाही.
जेटलींनी कोर्टात जाऊन तूर्त स्वत:ची सुटका करून घेतली. पण पुढेही त्यांना सोपे नाही. शत्रुघ्न सिन्हा रांगेत आहेत. आझाद यांनी थेट मोदींचे नाव घेतले नाही. उद्या मोदींचे नाव घेऊन शत्रुघ्न सिन्हा कुदणार आहे. भाजपावालेच मोदींची ही लंका पेटवणार आहेत. प्रश्न कुठले सरकार पडते आणि कुठले उठते, हा नाही. मोदी आल्या दिवसापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. चिखलफेकीची तर स्पर्धा लागली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तर केंद्र सरकारशी कुस्तीच चालवली आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनांचे आपण काय केले याची कुणाला आठवण होत नाही. घोषणांचा नुसता पाऊस सुरू आहे. काम कुठे दिसत नाही. राजकीय साठमारीत विकासाची कामे ठप्प आहेत. नुकसान जनतेचेच होते. कुणी पैसे खाल्ले हा मुद्दा या भांडणात मागेच राहतो. भाजपा विरोधी बाकांवरच शोभून दिसतो.
जनतेलाही हे पटायला लागले आहे. एक परिवार असूनही यांच्यात एकमत नाही. भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी परवा अखंड भारताची भाषा केली आणि आता आपणाला तसे बोलायचे नव्हते असे सांगत सुटले आहेत. बिहार निवडणुकीच्या तोंडावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या धोरणाचा आढावा घेण्याची आवश्यकता बोलून दाखवली. त्यांच्या वक्तव्याने भाजपाला बिहारमध्ये मार बसला. आता सरसंघचालक म्हणत आहेत की, आरक्षण हटवण्याचा प्रश्नच येत नाही. पण नुकसान व्हायचे ते होऊन गेले. अयोध्येत रामाचे मंदिर बांधण्याबाबत तसलाच सावळागोंधळ आहे. मंदिर तर बांधायचे आहे. पण केव्हा, याबद्दल कुणीच बोलत नाही. जनतेला वापरायचे, झुलवत ठेवायचे आणि गरज संपली की फेकून द्यायचे अशी ही कामाची पद्धती आहे.
भाजपावाल्यांना उघडे पाडायला काँग्रेसला ही सुवर्णसंधी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून सावरलेले काँग्रेस नेते आता ‘अच्छे दिन’च्या शोधात लागले, ही चांगली बाब आहे. सोमवारी साजरा झालेला काँग्रेसचा १३०वावर्धापन दिन याची साक्ष सांगता येईल. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य दिसते आहे. राज्यात लोकसभेच्या फक्त दोन तर विधानसभेच्या ४५ जागा आल्या. या धक्क्यातून सावरण्यासाठी काँग्रेसला बरेच महिने लागले.
राज्यसभेत भूसंपादन विधेयकाची कोंडी करण्यात काँग्रेसला यश आले. या यशातून गमावलेला विश्वास परत आला. दीड वर्षापूर्वी, काँग्रेस संपली की काय असे वाटत होते. पण काँग्रेस संपत नसते. काँग्रेस हरत नाही. काँग्रेसवालेच काँग्रेसला हरवू शकतात. गांधी घराणे हा पक्ष चालवत असले तरी मुळात हा जनतेचा पक्ष आहे. स्वातंत्र्यलढय़ातून आलेला पक्ष आहे. त्यामुळेच मोदींच्या दिग्विजयानंतरही भाजपाला दिल्ली व बिहारमध्ये प्रभाव पत्करावा लागला. मोदींना हरवले जाऊ शकते, हे वास्तव काँग्रेसला ऊर्जा देऊन गेले. शेतक-यांच्या प्रश्नावर प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. नागपूर विधानसभेवर एक लाखाचा मोर्चा गेला. नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या. पुढच्या वर्षी राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत. जनमताचा रेटा असाच चालू ठेवला तर याही निवडणुका सहज जिंकता येतील.