केंद्रातील मोदी सरकारने मंगळवारी १०० दिवस पूर्ण केल्यावर त्यांच्या कारभाराचा पंचनामा करणारे २१ प्रश्न काँग्रेसने जाहीरपणे विचारले आहेत.
मुंबई- केंद्रातील मोदी सरकारने मंगळवारी १०० दिवस पूर्ण केल्यावर त्यांच्या कारभाराचा पंचनामा करणारे २१ प्रश्न काँग्रेसने जाहीरपणे विचारले आहेत. गेल्या १०० दिवसांत न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप, घटनात्मक पदांची अवहेलना, प्रसार माध्यमांवर दबाव टाकत लोकशाहीच्या सर्व स्तंभाना धक्का देणारे हे सरकार आहे. सत्तेत आल्यावर मोदींनी कसे शब्द फिरवले, त्यांच्याच मित्रपक्षांनी कशा दुटप्पी भूमिका घेतल्या, आदींचे वस्त्रहरण काँग्रेसने केले आहे. त्यामुळे मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत मोदींनी यूपीए सरकारवर आरोप करताना गेल्या १० वर्षात देशाची वाट लागली असा आरोप केला होता. मात्र, पहिल्याच भूतान दौ-यात भारताने गेल्या १० वर्षात ‘नेत्रदीपक’ प्रगती केल्याचे विधान केले. मग यातील मोदींचे कोणते वक्तव्य खरे समजायचे, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे.
सीमेवर गोळीबार झाल्यावर देश असुरक्षित आहे, असे बोलून पाकिस्तानविरोधी हल्लाबोल करणा-या मोदींनी स्वत:च्या शपथविधीला नवाझ शरीफ यांच्यासाठी लाल गालिचा अंथरून बिर्याणीची मेजवानी दिली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी गप्प का राहिले?
चिनी सैन्य भारतीय हद्दीत ३० किमी आत येऊनही संरक्षण मंत्र्यांना त्याची साधी कल्पना नाही. हीच का पार्टटाइम संरक्षण मंत्र्यांची तत्परता? अणू कराराला याच लोकांनी विरोध केला. मात्र, सत्तेवर आल्यानंतर मोदी यांनी अणू ऊर्जेशिवाय पर्याय नाही. याचा अर्थ काय? जैतापूर विषयी रान पेटवणारे आता गप्प का बसले आहेत?
भाजपच्या अध्यक्षाच्या विरोधात गंभीर गुन्हे आहेत. तरीही ते पक्षाला कसे चालतात. हीच भाजपची नीतीमूल्ये आहेत का?
गुजरात सरकार विरुद्ध एका ज्येष्ठ विधीज्ञाने वकीलपत्र घेतले म्हणून त्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यापासून रोखण्यात आले. हीच भाजपची कायद्याची सन्मान करण्याची भूमिका आहे का? त्याच बरोबर घटनात्मक पदांची झालेली अवहेलना ही या सरकारच्या १०० दिवसात दिसून आली आहे.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणा-या मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे पंतप्रधान मात्र राष्ट्रपतींनी दिलेल्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार घालतात. ही देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीची अवहेलना नाही का? असे प्रश्न उपस्थित करून काँग्रेसने सरकारचा खरा चेहरा समोर आणला आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात भाजप सरकार असून तेथील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. तेथे का नियंत्रण मिळवले जात नाही. महागाई, कोलमडलेली अर्थव्यवस्था, अर्थमंत्री अरुण जेटलींचे निर्भयाप्रकरणी केलेले वक्तव्य या विषयीही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मीडिया पॅनेलचे सदस्य अनंत गाडगीळ यांनी ही प्रश्नावली तयार केली आहे.