भाजपचा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम वादाच्या भोव-यात सापडला आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या चाय पे चर्चा कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.
लखनौ – भाजपचा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम वादाच्या भोव-यात सापडला आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या चाय पे चर्चा कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. नमो टी स्टॉलवर मतदारांना मोफत चहा देणे हे एकप्रकारे लाच देण्यासारखे असून यामुळे मतदार प्रभावित होतात असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
उत्तरप्रदेशातील लखीमपूरमध्ये ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून आदर्श अचारसंहितेचा भंग झाल्याने आयोगाने कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई केली आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांचे भाषण एलईडी स्क्रीनवरुन मतदारांना दाखवले जाते. यावेळी उपस्थितांना मोफत चहा वाटला जातो.
निवडणूक आयोगाने जिल्ह्याच्या निवडणूक अधिका-यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी न घेतल्याबद्दलही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवडणूकीच्या काळात कुठल्याही वस्तूचे मोफत वाटप हा निवडणूक अचारसंहितेचा भंग ठरेल असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे.