अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पुण्यात मॉर्निग वॉकला जाऊन सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांना चोख प्रत्युत्तर दिले.
पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पुण्यात मॉर्निग वॉकला जाऊन सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांना चोख प्रत्युत्तर दिले. आपण कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, त्यामुळे मला जाळणा-यांनी खुशाल जाळावे; मात्र साहित्य संमेलनाला जरूर यावे, असे आवाहनही त्यानी भाजपवाल्यांना केले.
पुनाळेकर यांच्या धमकीनंतर पुण्यात ‘वॉक विथ श्रीपाल सबनीस’ फेरी काढण्यात आली. सनातन संस्थेचे संजीव पुनाळेकर यांनी मागील आठवडय़ात ‘सबनीस, तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निग वॉकला जात चला,’ असे ट्विट केले होते. यानंतर पुनाळेकर व सनातन संस्थेवर टीका झाली. डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉम्रेड गोिवद पानसरे यांची हत्या ते सकाळी मॉर्निग वॉकला फिरायला गेल्यानंतर झाल्या होत्या. हाच संदर्भ घेऊन पुनाळेकर यांनी सबनीस यांना धमकी दिल्याचे मानले जात होते, मात्र पुण्यातील विविध पक्ष-संघटनांनी सनातन संस्थेच्या धमकीला भीक घालत नसल्याचे सांगत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समवेत मार्निग वॉक केला.
सकाळी पुण्यात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोशल पार्टी (इंडिया), आरोग्य सेना, राष्ट्रीय सेवा दल व इतर अनेक संघटनांच्या सदस्यांनी या वॉकमध्ये सहभाग घेतला. सनातनच्या धमकीचा निषेध करत ‘लोकशाही जिंदाबाद, लोकशाही की ठोकशाही’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी स्वत: श्रीपाल सबनीस उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, आपला धर्म कोणाही व्यक्तीची हत्या करण्यास सांगत नाही. सनातन संस्था ही पुनाळेकर व त्याच्या काही सहका-यांनी हायजॅक केली आहे. मी माझे विचार स्वतंत्र्य घेऊन बोललो आहे. कोणाला मान्य असेल किंवा नसेल, मात्र भाजपच्या नेत्यांनी व मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाला जरूर आले पाहिजे. सबनीस या व्यक्तीसाठी येऊ नका तर मराठी साहित्यस्वार सतांच्या मेळाव्याला त्यांनी उपस्थिती लावली पाहिजे. ते नाही आले तर ते माझा नव्हे; सर्व साहित्यिकांचा अवमान असेल. मुख्यमंत्री विवेकशील आहेत. ते अविवेकी मार्ग स्वीकारणार नाहीत, असे ते स्वच्छ, प्रामाणिक व कार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचे सबनीस यांनी सांगितले.
तुम्ही माझा निषेध करा, माझ्या प्रतिकात्मक पुतळ्यांची धिंड काढा, ते जाळा; पण संमेलनाला, या असे सांगत विचारांची लढाई विचाराने लढा व हिंसक प्रतिक्रिया सोडून सहभागी होण्याचे आवाहन भाजपवाल्यांना केले.