ढगाळ वातावरणामुळे व अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे गणेशमूर्तीशाळेतील मूर्ती सुकवण्यात अडचणी येत आहेत.
मुंबई- ढगाळ वातावरणामुळे व अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे गणेशमूर्तीशाळेतील मूर्ती सुकवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मूर्तिकारांना स्टोव्ह, कोळसा पेटवून मूर्ती सुकवाव्या लागत आहेत. मूर्ती पूर्ण सुकल्याशिवाय त्यावर रंगकाम करता येत नाही. त्यामुळे मूर्तिकारांची कामे खोळंबली आहेत. तयार केलेल्या मूर्तीही वेळीच सुकत नसल्याने नव्याने मूर्तीची नोंदणी घेतली जात नसल्याचेही मूर्तिकारांनी सांगितले.
मुंबई परिसरातील गणेशमूर्ती तयार करणा-या बहुतांश कार्यशाळा असून या कारखान्यात जवळपास हजारो मूर्ती बनवल्या जातात. ढगाळ वातावरणात पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने कोळसा, गवत, पेटवून मूर्ती सुकवल्या जात आहेत. ओल्या मूर्तीवर रंगकाम केल्यास मूर्ती रंग खेचून घेतात व चमक कमी होते. गणेश उत्सवास एक महिना राहिला असताना अनेक मूर्तीवर आता रंगकाम करण्यास सुरुवात करण्यास आली, मात्र रंग सुकत नसल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सुकण्यास आणखी वेळ लागतो. बारीक नक्षीकाम असलेल्या मूर्ती आगीवर सुकवताना त्यांना तडा जाण्याची शक्यता असते, असेही मूर्तिकारांनी सांगितले.
अशा पद्धतीने सुकवली जाते मूर्ती
मूर्ती साच्यातून काढल्यानंतर त्या मूर्तीस हॅलोजन (मोठा वीज दिवा)च्या प्रकाशाखाली ठेवली जाते. रात्रीच्या वेळेत मूर्तीखाली कोळसे पेटवून ठेवले जातात. त्यानंतर रॉकेलच्या स्टोव्हचा वापर करूनही मूर्ती सुकवल्या जातात. तैलरंग काढण्यासाठी वापरण्यात येणा-या स्टोव्हचा वापर करून हे काम केले जाते. कोळशाची एक गोण ५० रुपये किमतीला विकत घ्यावी लागत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. रॉकेल, बर्नरचा खर्चही रोजच्या रोज येत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
गणेशोत्सव जवळ आला असताना मूर्तीवर रंगकाम करण्याच्या कामाला वेग आला आहे. परंतु पुरेसे ऊन नसल्याने मूर्ती या ओल्या राहत आहेत. त्यावर रंगकाम करता येत नाही. कोळसा पेटवून मूर्ती सुकवाव्या लागत आहेत. -सागर पांचाळ (मूर्तिकार)