मुंबईतील कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने ऐरोलीची नवीन जागा शोधली असून या जागेवर कचरा टाकण्यास मनसेने तीव्र विरोध केला आहे.
मुंबई – मुंबईतील कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने ऐरोलीची नवीन जागा शोधली असून या जागेवर कचरा टाकण्यास मनसेने तीव्र विरोध केला आहे. मुलुंड व ऐरोलीत केवळ खाडीचे अंतर असून येथे कचरा टाकल्यास त्याच्या दरुगधीचा त्रास मुलुंड-भांडुपकरांना सहन करावा लागणार आहे. मुलुंडला कचरा टाकण्यास भाजपाचा विरोध आहे. परंतु ऐरोली हे मुलुंडपासून दूर नाही. त्यामुळे मुलुंडला कचरा टाकण्यास विरोध करणारी भाजपा ऐरोलीत कचरा टाकण्याचे प्रशासनाने जाहीर केल्यानंतर गप्प का? त्यांना ऐरोलीत कचरा टाकलेला कसा चालेल, असा सवाल मनसे नगरसेविका अनिषा माजगावकर यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केला.
[poll id=”1296″]
मुंबई महापालिकेच्या सन २०१६-१७च्या अर्थसंकल्पीय चर्चेत भाषण करताना मनसे नगरसेविका अनिषा माजगावकर यांनी कोणत्याही परिस्थितीत ऐरोलीत कचरा टाकण्यास दिला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्प मांडताना मुंबई-ऐरोली येथील जमिनीची संयुक्त मोजणी करून जमीन ताब्यात घेतली जात असून तेथे कचरा प्रक्रिया केंद्र उभारले जाईल, असे स्पष्ट केले. याचा समाचार अर्थसंकल्पीय भाषणात घेत पूर्व उपनगराला गॅसचे चेंबर बनवण्याचे काम प्रशासन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग या तीनही कचरा भराव भूमी पूर्व उपनगरातच आहे. आता ऐरोलीत कचरा भराव भूमी तयार केली जाणार आहे. ऐरोलीत कचरा भूमीला मनसेचा विरोध असून ज्याप्रकारे हिटलरला गॅस चेंबरमध्ये कोंबून मारण्याचा प्रयत्न केला गेला तसाच प्रयत्न पूर्व उपनगरातील लोकांना कच-याच्या गॅसमध्ये कोंबून मारण्याचा पालिकेकडून सुरू आहे. प्रशासनाचा हा प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आयुक्तांनी ऐरोलीत कचरा टाकण्याचे जाहीर केल्यानंतर प्रथमच मनसेतर्फे विरोधाची भूमिका मांडण्यात आल्यामुळे तळोजापाठोपाठा ऐरोलीतही विरोधाचे निशाण फडकले जाईल, असे बोलले जात आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे द्या
स्वच्छतेबाबत जनजागृती होत नसल्याने नागरिकांत शिस्त दिसून येत नाही. ही शिस्त लावण्यासाठी शाळांमधून स्वच्छतेचे धडे द्यायला हवे. पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रमात स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना दिल्यास स्वच्छता कशाप्रकारे राखली जावी, याची माहिती मिळेल. याचे आचरण प्रत्येक घराघरांत करतानाच मोठय़ानाही इतरत्र कचरा फेकण्यापासून परावृत्त केले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.