त्यांना प्रामाणिकपणे काहीतरी करायचे आहे..या ध्येयातून ते चार जण एकत्र झाले. मालवणी बोलीच्या वेडातून ते झपाटून गेले. अवतीभोवती घडणा-या घटनांनी फेर धरलो..कलाकार एकत्र झाले. कॅमेरे फिरले आणि मालवणी बोलीतलो..मालवणी मुलखातलो ..मालवणी चित्रपट तयार झालो. सगळा काय ता मालवणी माणसान केल्यान..आणि भिकू मोठय़ा पडद्यावर झळाकलो..तो आता हिरो झालो..गावातलो कलाकार चुलीकडच्या बोलीतच चावडीवर बिनधास्त बोलाक लागलो..!
आमचा मालवणी मुलूख म्हणजे साधारणत: बांद्यापासून म्हणजे गोव्याच्या उत्तर सीमेपासून खारेपाटणपर्यंतचा भाग! म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा! हाच मालवणी मुलूख आणि या मुलखाची बोलीभाषाही मालवणीच. गेल्या कित्येक शतकापासून जनसामान्यांचे सारे व्यवहार या भाषेतूनच चालत आले आहेत. मराठी भाषेपुरते बोलायचे झाल्यास तिच्या अनेक बोलीभाषा मराठी भाषिकांना परिचित आहेत. मालवणी ही त्यापैकीच एक. भाषेच्या अभ्यासकांच्या मते, मालवणी भाषा ही एक गोड भाषा आहे. या भाषेत असे काही बारकावे आहेत की, त्या भाषेच्या एखाद्या जाणकाराशी मालवणी भाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न करणारा दुसरा माणूस मालवणी मुलखातल्या कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण,कणकवली,खारेपाटण, वैभववाडी की देवगड, विजयदुर्ग यापैकी नेमक्या कोणत्या भागात वास्तव्य करणारा आहे हे त्याचे शब्दोच्चार किंवा भाषेतील ‘हेल’ आणि शब्दरचना यावरून तो सहज ओळखू शकतो. या मालवणी भाषेचे नातेसंबंध गोवा, कारवार येथील लोकभाषांशी असले तरी मालवणी ही एक स्वतंत्र अशी भाषा आहे. येथील भाषा जशी वेगळी तसा इथला मालवणी माणूसही एक अजब रसायन आहे. हे रसायन फक्त मालवणी मुलखातच जन्म घेते. जगाच्या पाठीवर इतरत्र ते कोठेही नाही. या माणसाचे जिणे-जगणे कै.वि.कृ.नेरूरकर, वि.वा.हडप, वि.स.खांडेकर अशा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी आपल्या लेखनातून शब्दांकित केले आहे. त्यानंतरच्या काळात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कै.जयवंत दळवी, कै.डॉ. वसंत सावंत, कै. प्र. श्री. नेरूरकर, तसेच अनेक साहित्यिकांनी मुलखातील अनेक त – हा आपापल्या साहित्यातून प्रकट केल्या आहेत. एकूण मराठी साहित्याच्या प्रांगणात मालवणी माणूस, मुलूख आणि मालवणी लोकभाषा यांना मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. यातील मालवणी माणूस मात्र या सर्व साहित्यिकांचे ‘शब्द व्यापूनी दशांगुळे उरला!’ असे वाटते.
हा माणूस येथील गोडय़ा पाण्याच्या नदीत आढळणा-या ‘मरळ माशासारखा सुळसुळीत’ आहे. सहसा हातात सापडत नाही आणि बेरक्या माणसाला शब्दरूप देणे किंवा त्याचे चित्रांकन करणे ही सोपी गोष्ट नाही. या संदर्भात आणखी एका व्यक्तीचा महत्त्वाचा सहभाग आहे. ती व्यक्ती म्हणजे दिवंगत नाटय़ अभिनेते मच्छिंद्र कांबळी. ‘चाकरमानी’ आणि ‘वस्त्रहरण’, ‘केला तुका झाला माका’ अशा नाटकांमधून मालवणी मुलूख, भाषा, माणूस, लोकजीवन यांचे यथार्थ दर्शन त्यांनी या माध्यमातून मराठी माणसाला घडविले.
साहित्यात, नाटकात मालवणी माणूस मुक्तपणे, मनसोक्तपणे वावरत असताना मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत मालवणी म्हणजे एक विनोद, मनोरंजनाचा भाग,किचकट विचकट बोलणे अथवा एखादे गाऱ्हाणे घालण्यापुरताच.. एवढीच मुलखातल्या माणसाची छबी मर्यादित होती. हे बंध झुगारून देऊन या लाल मातीत असणा-या प्रज्ञावंत कलावंतांनी या मुलखातच राहून या मुलखातल्या कलावंताना एकत्र करत मुलखातच मालवणी बोलीचा चित्रपट तयार केला. हा मुलूख नररत्नांची खाण म्हटला जातो. येथील अनेक कलावंतांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर रंगमंचावरही आपले असे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. येथील दशावताराची ख्याती सर्वदूर आहे. कोणतेही नेपथ्य नसताना आपल्या संवाद आणि वेशभूषेवर सारा रंगमंच उभा करणारे अनेक कलावंत येथे आहेत आणि त्यांना डोक्यावर घेणारे रसिकही! या कलावंतांपैकी काही जणांनी मुलूख सोडला, शहर गाठले आणि कलावंत म्हणून आपले स्थान पक्के केले. पण अशी अनेक मंडळी आहेत जी या मुलखातच राहिली आणि त्यांनी मुलखातच आपली कला जोपासली. मालवणी बोलीच्या गोडीतच ती वावरत आहेत.. मालवणी माणसाला मालवणी बोली तर आवडतेच शिवाय अन्य भाषिकांनाही ती बोलता येत नसली तरी तिची गोडी वाटते. या मालवणीचा डंका सर्वदूर पिटावा म्हणून अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. आता कणकवलीतील काही युवा कलाकार मंडळींनी एकत्र होत कलावंताचे आकाश मोकळे करण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. मालेगावमधील चित्रपटसृष्टीची ख्याती आपण ऐकून आहोत. मालेगावचे कलाकार आपल्याच भागात चित्रपट तयार करतात आणि तेथेच त्याचे प्रसारणही होते. बजेटचा प्रश्न असला तरी तो आपल्या स्तरावर सोडवला जातो. आहे त्या साधनसामग्रीत तो हौस भागवत असतो.
मालवणी माणसाच्या मुळातच ठासून कलागुण भरलेले असल्याने त्याने एकदा मनावर घेतले तर त्याला काहीच अवघड वाटत नाही. ही युवा मंडळीही अशीच पुढे सरसावली आणि अस्सल मालवणीतला पहिला ‘भिकू’ चित्रपट तयार झाला.
मोठय़ा पडद्याचे आकर्षण सर्वानाच असते. दृकश्राव्य माध्यमात कमालीची क्रांती झाली आहे. भविष्यात डिजिटलायझेशनचा व्याप अधिकच वाढणार आहे. अशावेळी कलावंतांना एक सक्षम व्यासपीठ मिळवून देणारे आणि कलावंतांची ख्याती सर्वदूर नेणारा एक मंच आपोआप तयार झाला. गरज ही शोधाची जननी आहे. या उक्तीप्रमाणे मुळातच कलागुण असलेल्या येथील कलावंतांनी आपल्या व्यासपीठाचा रंगमंच खुला केला.
विविध लोककला,नाटय़संपदा जपत, टिकवत, धडपडत असताना चित्रपटसृष्टी त्यांना साद घालत असते. पण कुठेतरी माशी शिंकतेच.. मग अशा कलावंतांचा हिरमोड होतो. कला असूनही अवघडल्यासारखे होते.आपल्या बोलीतला कोण चित्रपट करेल का? ही वाट पाहण्यापेक्षा आपणच ते का करू नये असा विचार या क्षेत्रात वावरणा-या कणकवलीतल्या शशिकांत कांबळी यांच्या डोक्यात आला. शशिकांतने सिनेमॅटिक वर्कशॉप केले आहेत आणि फिल्म मेकिंगबाबत त्याला थोडीफार माहिती आहे. त्याने आपल्या मित्राला सांगितले आणि साऊें इंजिनीअरिंग करणा-या प्रितीश कामत, विरेन वालावलकर, मितेश चिंदरकर, श्याम सामंत हे तरुण एकत्र आले. चित्रपट करण्याचे त्यांनी वेड डोक्यात भरविले आणि ते झपाटून गेले. कलाकार अवतीभोवतीच होते. तंत्रज्ञ शोधायचा प्रश्नच नव्हता? कमी तेथे आम्ही अशी वावरणारी हौशी कलावंत मंडळी कमी नाहीत. कथा निश्चित होती.. संवाद-पटकथा,गाणी सारे अगदी झकपक. एखाद्या कसदार कलाकारांनी ख्यातकीर्त प्रॉडक्शनची निर्मिती असावी असा दस्तऐवज तयार झाला आणि त्यातून भिकू साकार झाला.
येथील कलावंतांनी अद्ययावत तंत्रज्ञानासारखी फिल्म व्हावी यासाठी के लेल्या कसरती, त्यासाठी केलेले मेकिंग पाहता थक्क व्हायला होते. गंमत सांगायची तर दिग्दर्शक शशिकांत कांबळी यांनी चित्रपटातील वेगवेगळय़ा इफेक्टससाठी कॅमे-याचे कोन टिपण्यासाठी, प्रकाश परिणामांसाठी केलेली अनेक दिव्य पाहिली, आणि त्या मेकिंगचे संवाद ऐकले तर चित्रपटामागचा अनोखा चित्रपट तयार होईल.
हा चित्रपट मालवणीवर प्रेम करणा-या माणसांनी तर पाहायलाच हवा. शिवाय अन्य भाषिकांनीही तो पाहावा. हा मुलांचा पहिलाच प्रयत्न असला तरी तो नवख्यांची निर्मिती आहे असे वाटत नाही.
५० वर्षापूर्वीच्या काळात मुंबईसारख्या शहरात मालवणी माणसे सार्वजनिक ठिकाणी आपल्या बोलीभाषेतून, मालवणीतून एकमेकांशी बोलण्यास धजत नसत. आपण मालवणीतून बोललो तर ही शहरी माणसे आपणाला हसतील. गावंढळ म्हणून हिणवतील, अशी त्यांना भीती वाटे. या भीतीमुळे मालवणी मुलखातून मुंबईत गेलेली माणसे शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करीत. तेही त्यांना जमत नसे. मग ‘तुम्ही ऱ्हवायला कुठे?’ असे विचारणारी एक विचित्र भाषा रूढ झाली होती. कै. मच्छिंद्र कांबळी जातिवंत कलावंतांनी आपल्या नाटय़कलेच्या माध्यमातून मालवणी भाषा अवघ्या महाराष्ट्रासमोर आणण्याचे धाडस केले. मालवणी नाटक परदेशातही गेले. या वर्षी तर वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर हे अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद भूषवित आहेत. मालवणीची ही ख्याती आणखी काय सांगावी.. त्यामुळे मालवणी भाषा माणूस आणि मुलूख याकडे मराठी माणसे कौतुकाने आदर आणि आपुलकीच्या नजरेने पाहू लागली. ‘भिकू’मुळे तर ही गोडी आणखीनच वाढणार आहे. हा मालवणी बोलीतला मुलखातल्या माणसांनी केलेला प्रयत्न विलक्षण आणि लक्षवेधी आहे. कालपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीत आपल्याला स्थान मिळावे यासाठी धडपडत असणा-या या मुलखातल्या कलावंतानेच आता आपल्याकडेच चित्रपटसृष्टीच खेचून आणन्याचा मनसुबा रचला आहे.
हिरोईन झालीहा..
मालवणी मुलूख म्हणजे अस्सल टोमणेबहाद्दर. चित्रपट निर्मिती दरम्यान आपल्या भागातील मंडळी काय करत आहेत हे गाववाल्यांना समजत नव्हते. घरातील अनेक जण या मुलांना वेगवेगळय़ा भाषेत सुनवायचे. त्यातील काही संवाद चित्रपटातही घेण्यात आले आहेत. ‘हिरोईन झाली म्हणून आकाडता हा’ हा संवादही या टोमण्यातलाच.. चित्रपटात काम करणा-या मंडळींपेक्षा चित्रपट तयार करताना कॅमेरावाल्यांची कसरत, इतर स्पॉट बॉय आणि त्यांची सर्कस पाहण्यासाठी मंडळी गर्दी करायचे आणि ब-याच वेळा शूटिंग आटोपते घ्यावे लागायचे.
भिकू बघायचाय..?
अलीकडे भाषांची मिसळ झाली आणि नवे शब्द नवी बोली प्रचलित होऊ लागली आहे. अशा वेळी मालवणीवर प्रेम करणा-या मंडळींना ‘भिकू’ निश्चितच आश्वासक आहे. ‘अॅडलिब्ज’ निर्मितीतर्फे निर्माण करण्यात आलेल्या या चित्रपटाविषयी ‘भिकू’चे दिग्दर्शक शशिकांत कांबळी, संगीतकार मितेश-प्रितेश म्हणतात, मालेगाव येथे कमी खर्चाच्या फिल्म बनवल्या जातात हे आम्ही ऐकून होतो; पण त्या फिल्म हिंदी भाषेतूनही बनवल्या जातात. मात्र, आपण आपल्या बोलीतूनच आपली पूर्ण लांबीची फिल्म बनवायचा, असा निर्णय घेतला. हे धाडस करताना आम्ही यात यशस्वी होऊ की नाही हे आम्हाला माहीत नव्हते; पण काम केल्याशिवाय यश की अपयश समजणार कसे? डोहात उडी घेतल्याशिवाय पाण्याची खोली समजणार कशी? मग आम्ही उडी घेतली. रात्रीचा दिवस केला. कलाकार आमचेच होते. कधी-कधी कलाकारांच्या सोयीनुसार तर केव्हा-केव्हा एकूण परिस्थितीशी तडजोड करून कथा आकार घेत गेली. जशी अभिनेत्री मिळाली तशी कथा केली. शोचा प्रीमियर होईपर्यंत चित्रपटाचे अनेक भाग बदलत होते. सगळीच मजा. यातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ कणकवलीतलेच आणि मालवणीवरचे प्रचंड प्रेम यांच्यामुळेच आम्ही या फिल्मची निर्मिती करू शकलो. पहिल्याच प्रयत्नाने मनाला उभारी मिळाली..
मालवणी आमच्या तनामनात आहे..येथील लोककला मनाभोवती पिंगा घालताहेत.त्यामुळे पुढचे पाऊल ठरलेलेच आहे..हा युवावर्गाचा विश्वास मनाला सुखद अनुभूती देतो. सर्वाना भुरळ घालणारा हा मुलूख माझा आहे..मी या मातीतला आहे.. याचा अभिमान वाटतो, हे काय वेगळे सांगायला हवे.
मालवणीतील पहिल्या ‘भिकू’ चित्रपटाची निर्मिती
दिग्दर्शन, निर्माता, अभिनेते, संगीत, कॅमेरा आणि सर्व तांत्रिक अंगे अगदी ‘सबकुछ’ स्थानिक कलाकारांची निर्मिती असलेल्या या कलाकृतीचे नाव आहे ‘भिकू’! शशिकांत कांबळी, प्रितेश, मितेश आणि त्याच्या मित्रांनी हा निर्माण केला आहे. ‘भिकू’च्या शुभारंभाचा शो कणकवलीत करण्यात आला. त्याला मोठा प्रतिसाद होता. मालवणी नटसम्राट स्व. मच्छिंद्र कांबळी यांचे सदाबहार नाटक ‘वस्त्रहरण’ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचून रसिकांच्या पाठबळाचे सर्व रेकॉर्ड या नाटकाने मोडले. तेव्हा कांबळी यांनी ‘करूचा ता दणक्यात’ हा मालवणी बोलीतील पहिला चित्रपट निर्माण करू, अशी घोषणा केली होती. पण त्यांच्या अकाली निधनाने ती पूर्णत्वास जाऊ शकली नाही. मात्र ‘भिकू’च्या निर्मितीने मालवणीतील पहिला चित्रपट निर्माण करण्याचा सन्मान कणकवलीकरांना येथील जिद्दी तरुणाईमुळे प्राप्त झाला आहे. मालवणीतला हा चित्रपट आमच्याकडे पाहायला मिळावा अशी निर्मात्यांकडे मागणी आली की..टुरिंग टॉकीजप्रमाणे हौशी मंडळी पुढे सरसावतात..
कणकवली भागात चित्रीकरण
‘भिकू’चे चित्रीकरण कणकवली शहर, कनेडी, बांदिवडे, डिगस पोखरण,वरवडे, हरकूळ, शिवडाव,जांभवडे, सोनवडे आदी भागात झाले आहे. कलाकारांबरोबरच पार्श्वसंगीत, संगीत, छायांकन, संकलन, प्रकाशयोजना, गीत लेखन, गायक आदी कलाकार येथीलच आहेत. यात विवेक वाळके, राकेश काणेकर,अभय खडपकर, नील सुखटणकर,प्रणाली चव्हाण, अक्षता कांबळी, सुहास वरुणकर, राहुल कडुलकर, साक्षी कर्पे, दिनेश पाटील, वीरेन वालावलकर, अमृता गावकर, विजय गावकर, राहुल कदम, अभय नेवगी, यज्ञेश शिर्के, डॉ. विठ्ठल गाड, राहुल कदम आर. के., मेघा गांगण, दर्शन म्हाडगूत, अनिल कांबळी, ज्ञानेश्वर राणे, ओंकार परब, विरेश वळंजू, जीवन हजारे, शैलेश सावंत, कदम क्लार्क, मितेश चिंदरकर, मितेश चिंदरकर, नम्रता परुळेकर, समीर प्रभूमिराशी, प्रसाद घाणेकर, सौदामिनी टिकले,संजय कदम, रुपेश साळुंखे आदी कलाकारांनी काम केले आहे.
गीतलेखन प्रिती बावकर आणि मितेश-प्रितेश यांनी केले असून गायन धीरेश काणेकर आणि श्यामल सावंत, प्रितेश कामत यांनी केले आहे. छायांकन अॅण्ड्रय़ू फर्नाडिस, श्याम सावंत, कला दिग्दर्शन रविकिरण शिरवलकर, सिद्धेश मांडवकर, यांचे आहे. वेशभूषा, रंगभूषा अमृता गावकर, रोहन पारकर, विभावरी नाडकर्णी यांची आहे. संतोष काकडे, बाळा भिसे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या मुलखातील नजरबंदी करणारा एक घटक म्हणजे निसर्ग. जगातील कोणीही निसर्गप्रेमी पहिल्याच या मुलखाच्या प्रेमात पडेल अशी जबरदस्त ताकद येथे आहे. या निसर्गसौंदर्यात वावरणा-या येथील माणसाची कलासक्तीही तेवढीच मजबूत आहे. त्याला भाकरीची चिंता नाही आणि त्याच्या कल्पकतेला,हजरजबाबीपणाला कोणी रोखू शकत नाही. सर्वाधिक कलावंत,सर्वाधिक तंत्रज्ञ ,सार्वाधिक नेपथ्यकार या भूमीने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. लोककलांमध्ये अनेक कलावंतांनी आपले असे स्थानही निर्माण केले आहे. या सगळय़ा पार्श्वभूमीवर भिकू या चित्रपटाची कलात्मकता समजून घेताना मती गुंग होते.
माझ्या मालवणीचे बोल..
‘भिकू’चा ट्रेलर जेव्हा सर्वत्र दाखविण्यात आला तेव्हापासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत जिथे मालवणी माणूस आहे, तेथील अनेकांनी हा चित्रपट आपल्या भागात दाखवावा, अशी मागणी आहेच. भिकूची मजा पाहायची तर दिग्दर्शक : शशिकांत कांबळी ९४२२१४७७७३ आणि प्रितीश कामत ९४२३३३३१०३ यांच्याशी संपर्क करू शकता.. भिकूची भूमिका विवेक वाळके यांनी केली आहे. या वाळकेंना आता मुलखात भिकू म्हणूनच साद घालतात..