दिवसेंदिवस वाढणा-या लोकसंख्येला पुरेल इतके अन्नधान्य निर्माण करण्यासाठी सरकार देशातील जमिनीत विविध प्रयोग करून उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. जमिनीत विविध प्रयोग करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणा-या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून सिंचन तलाव, लघुपाटबंधारे बांधले जात आहेत.
मुरबाड – दिवसेंदिवस वाढणा-या लोकसंख्येला पुरेल इतके अन्नधान्य निर्माण करण्यासाठी सरकार देशातील जमिनीत विविध प्रयोग करून उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. जमिनीत विविध प्रयोग करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणा-या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून सिंचन तलाव, लघुपाटबंधारे बांधले जात आहेत. मुरबाड तालुक्यातील शेतक-याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहू नये, शेतक-यांनी दुबार पिके काढावीत तसेच पेयजलाचा पुरवठा व्हावा म्हणून लघुपाटबंधारे विभाग, कोकण पाटबंधारे विभागाकडून ११ लघुपाटबंधारे बांधण्यासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र या ११पैकी एकाही पाटबंधा-याचे पाणी पाटात आले नसल्यामुळे शेतकरी दुबार पिके घेण्याऐवजी शेतजमीन विकू लागला आहे.
मुरबाड लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील सावरोली (सो)जवळील नामपाडा-कुतरकुंड धरण परिसरातील सात गावपाडय़ांतील शेतक-यांची शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधले जात आहे. आजपर्यंत ११ कोटी रुपये खर्च करूनही वन विभागाची परवानगी न घेतल्यामुळे हे धरण रखडले असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. नाव्हेंबर २००५मध्ये मंजूर झालेल्या नामपाडा-कुतरकुंड बंधा-याचे काम मुळातच उशिरा २००९मध्ये सुरू करण्यात आले. या पाटबंधा-यांमुळे सावरोली, कानडी, नांदगाव, खरीवली, बेलकडी, झापवाडी, वडाची वाडी व नामपाडा या गावपाडय़ांतील ६५२ हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येऊन वर्षानुवर्षे पाण्यासाठी तहानलेला व वणवण भटकणारा इथला माणूस सुखी होणार आहे. या पाटबंधा-यातून पाच किमीचा डावा व २.५० किमीचा उजवा कालवा प्रस्तावित आहे. त्यामुळे इथली जमीन पूर्णत: ओलिताखाली येऊन सुजलाम् सुफलाम् होणार आहे. शेतक-यांच्या हितासाठी नेहमी भेडसावणारा पाण्याचा प्रश्न कायम मिटवण्यासाठी काही आदिवासी शेतक-यांनी आपल्या खासगी जमिनीसुद्धा प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत. परंतु मुरबाड उपविभागीय बंधा-याचे काम लवकरात लवकर सुरू करावे व पाटात पाणी यावे, यासाठी कळवा येथील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाने ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच ज्या शेतक-यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात आल्या आहेत. त्यांना दुसरी जमीन देण्याचे आश्वासन विभागाने पूर्ण न केल्यामुळे संतोष दवणे कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले.
वन विभागाची परवानगी मिळाली नसल्यामुळे बंधा-याचे काम थांबले आहे. परवानगीसाठी पाच कोटी १९ लाख दिले आहेत. लवकरच काम सुरू होईल. – एम. एन. सातव, लघुपाटबंधारे विभागीय कार्यालय, कळवा
मी नवीनच कार्यभार स्वीकारला आहे. बंधा-याची पाहणी केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाचा आदेश आल्यानंतर कंत्राटदाराला बोलावून काम सुरू केले जाईल. – एस. पी. सोनवणे, उपअभियंता, लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालय, मुरबाड
लवकरात लवकर काम सुरू झाले नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ कळवा विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करू.- संतोष दवणे, सामाजिक कार्यकर्ते, सावरोली
कंत्राटदार एम. एम. भट यांनी बंधा-यावर आम्ही केलेल्या कामांचे बिलसुद्धा दिलेले नाही. फोनसुद्धा बंद केला आहे. आम्ही त्याची वाट पाहत आहोत.– मंगल निरगुडा, नामपाडा (मटेरियल सप्लायर)